पुणे – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरूवात झाली आहे. हा पाऊस पुढील काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे शहरात पाणीकपात लावण्याबाबत पुढील आठवड्यात होणाऱ्या आढावा बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.
महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शहराच्या पाणी नियोजनाबाबत बोलवलेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महापालिका आयुक्त विक्रम कुमार, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपड, अतिरिक्त आयुक्त शांतनू गोयल यावेळी उपस्थित होते. दरम्यान, पुढील आठवड्यात पुन्हा बैठक होणार असली, तरी गणेशोत्सव संपेपर्यंत कोणतीही पाणीकपात करण्यात येणार नाही. तसेच त्यानंतरही गरज पडली, तरच त्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
खडकवासला धरणसाखळीत सध्या 37 टक्के पाणीसाठा आहे. तसेच जुलै संपला, तरी पुरेसा पाऊस न झाल्याने पुढील पावसाचा अंदाज लक्षता घेऊन तसेच शहर आणि जिल्ह्यासाठी लागणारे पाणी लक्षात घेऊन महापालिकेने काही प्रमाणात पाणीकपात करावी, असा आग्रह पाटबंधारे विभागाने केला होता. त्याचे पत्रही पालिकेस देण्यात आले होते. त्यावर निर्णय घेण्यासाठी महापौरांनी मंगळवारी महापालिकेत बैठक बोलवली होती. यावेळी महापौरांनी हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.
तसेच धरणात सुरू असलेल्या पावसाची माहितीही घेतली हा पाऊस पुढे काही दिवस असाच सुरू राहणार असून तीन ते चार टीएमसी पाणी वाढण्याची शक्यता आहे. तसेच 15 ऑगस्टनंतर पुणे परिसरात 104 टक्के पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे धरणात पुरेसे पाणी उपलब्ध होईल, त्यामुळे तूर्तास कपात करू नये अशा सूचना महापौरांनी केल्या आहेत. पाटबांधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची बाजूही समजून घेण्यात आली आहे. पावसाचा अंदाज लक्षात घेऊन पुढील आठवड्यात 12 ऑगस्टला पुन्हा आढावा बैठक बोलवण्यात आली आहे. त्या दिवशी पाण्याच्या प्रत्यक्ष स्थितीचा आढावा घेऊन पाणीकपातीचा निर्णय घेतला जाणार आहे.