पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यात मोरगाव हा अष्टविनायकांपैकी पहिला गणपती आहे. येथून 13 किलोमीटर अंतरावर कऱ्हा नदीतीरी पांडवेश्वर म्हणजेच पांडेश्वर हे प्राचीन शिवमंदिर आहे. मंदिराची रचना हेमाडपंती आहे. या मंदिराचे वैशिष्ट्ये म्हणजे शंकराची भव्य पिंड सिंहासनावर उभारली आहे. ही पिंड पांडवांनी दान केल्याची आख्यायिका सांगितली जाते.
पांडेश्वर येथे धार्मिक कार्यासाठी पांडवांना पाण्याची गरज होती. त्या वेळी गराडेच्या परिसरात दुर्वास ऋषी तपश्चर्येला बसले होते. त्यांचा कमंडलू अर्जुनाने बाणाने लवंडला. तसे महाक्रोधी दुर्वास ऋषी अर्जुनाच्या मागे लागले. अर्जुनाने परत पांडेश्वरकडे येताना जागोजागी बेल आणि तांदूळ ठेवले. बेल व तांदूळ दिसल्यामुळे दुर्वास ऋषींनी वालुकामय शिवलिंग स्थापून त्याची पूजा केली. अशी जागोजागी त्यांनी पूजा केली. हा अवधी मिळाल्याने अर्जुन पांडेश्वरापर्यंत सुखरूप पोहोचला.
अर्जुन कुठे आला हे विचारले असता, जवळार्जुनला आल्याचे सांगण्यात आले. म्हणून या स्थानाला जवळार्जुन नाव पडले. बेलसर या ठिकाणी पूजेसाठीचे बेल संपले होते म्हणून बेलसर नाव पडले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या लढ्यातील पहिले युद्ध बेलसर येथे केले. आदिलशहाचा सरदार फत्तेखानाच्या सैन्याबरोबर झालेल्या या लढाईतील विजयाची प्रतीके कऱ्हा नदीच्या दक्षिण व उत्तरेच्या तीरावरील घुमटेश्वर मंदिराच्या रूपात आहे.
दोन्ही मंदिरांच्या दर्शनी बाजूच्या शीलालेखांमधून या इतिहासाची माहिती मिळते. असा ऐतिहासिक समृद्ध वारसा या मंदिरांना लाभला आहे. तसेच येथील विलोभनीय शिल्पसौंदर्य मन वेधून घेते. दुर्वास ऋषींनी जिथे जिथे शिवलिंगाची स्थापना केली. तिथे वटेश्वर, संगमेश्वर, नागेश्वर अशी भव्य आणि सुंदर शिवमंदिरे आहेत.
– माधुरी शिवाजी विधाटे