कोल्हापूर – इचलकरंजी शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून येथील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ लागलेली आहे. या पार्श्वभूमीवर तातडीने आरोग्य सुविधा पुरवाव्यात. तसेच खासगी दवाखाने त्वरीत सुरू करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे.
इचलकरंजी येथे प्रातांधिकारी विकास खरात यांची भेट घेऊन त्यांनी आज चर्चा केली. तसेच मुख्याधिकारी संतोष खांडेकर व आयजीएमचे वैद्यकीय अधिष्ठाता रविंद्रकुमार शेट्ये यांचीही भेट घेतली. राजू शेट्टी म्हणाले की, सध्या शहरामध्ये 700 रुग्णांच्या बेडची सोय असून झपाट्याने करोना रूग्णांची संख्या वाढत चाललेली आहे. पॉझिटीव्ह रुग्णांवर योग्य ते उपचार होण्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क झाली पाहिजे.
इचलकरंजीमधील परिस्थितीबाबत चर्चा करून ज्यांना कोणतीही लक्षणे नाहीत, त्यांना होम क्वारंटाईन अथवा शहर व परिसरातील हॉटेल्स ताब्यात घेऊन होम कन्सलंटिग सेवा सुरू करण्याबाबत प्रशासनाने गांभीर्याने उपाययोजना कराव्यात. तसेच शहरातील बहुतांश खासगी डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवले आहेत.
त्यामुळे इतर रुग्णांचे हेळसांड होत आहेत. सदर डॉक्टरांना तातडीने सेवा सुरू करण्यासंदर्भात आदेश काढावेत. जेणेकरून इतर रूग्णांना वेळेत उपचार मिळतील, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.