मुंबई: राज्यात “मिशन बिगीन अगेन’ची प्रक्रिया सुरू झाली असून आता पुन्हा लॉकडाऊन होणार नाही. तसेच जास्तीत जास्त गोष्टी पुन्हा सुरू केल्या जातील. सध्या जिम, शॉपिंग मॉल सुरू करण्याबाबत सरकार विचार करत आहे. मात्र, लोकल ट्रेन सुरू करण्याबाबतचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
मुंबईत पार पडलेल्या पत्रकार परिषदेत राजेश टोपे बोलत होते. यात त्यांनी पुण्यात आयसीयू बेड्सची कमतरता, क्वारंटाइन सेंटरमध्ये महिलांचा विनयभंग, प्लाझ्मा दान यासारख्या अनेक विषयांवर माहिती दिली.
राजेश टोपे म्हणाले, नालासोपारा, वसई, विरार या भागातून मोठ्या संख्येने लोक मुंबईत कामाला येतात. त्यामुळे लोकल सेवा सुरू कराव्यात, अशी मागणी अनेकजण करत आहे. लोकांची मागणी रास्त आहे. मात्र, ट्रेनमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. त्यामुळे ट्रेन सुरू करायच्या की नाही याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील.
अँटीबॉडिज किंवा प्लाझ्मा दान हे फार महत्त्वाचे आहे. प्लाझ्मा दान करण्याचे सेंटर वाढवण्यात येत आहेत, जेणेकरून जास्तीत जास्त प्लाझ्मा घेतला जाऊ शकतो. लवकरच धारावीत प्लाझ्मा बॅंक सुरू करण्यात येईल. याबाबत आयसीएमआरने काही कडक नियम शिथिल केले तर जास्तीत जास्त लोकांना प्लाझ्मा देता येतील, असेही राजेश टोपे म्हणाले.
पुण्यातही “मिशन झिरो’ ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या ठिकाणी ऍक्टिव्ह रुग्ण संख्या कमी करणे, बेडची संख्या वाढवणे, आयसोलेशन करणे, टेस्ट करणे या सगळ्या गोष्टी अंमलात आणल्या जात आहेत. सिंगल पॉईंट कॉन्टेक्ट ही प्रणाली तयार केली जाईल. ही संकल्पना नाशिक, पुणे एमएमआर रिजनमध्ये राबवली जाणार आहे. जेणेकरून एका ठिकाणी सर्व माहिती गोळा होईल. त्यामुळे करोनावर अटकाव आणण्यास मदत होईल.
राज्यातील क्वारंटाइन सेंटरमध्ये होणाऱ्या घटना निंदनीय आहे. या सर्व घटनांनी माणुसकीला काळिमा फासल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीर क्वारंटाइन सेंटरबाबत लवकरच गाईडलाइन्स तयार केल्या जातील. तसेच क्वारंटाइन सेंटरमध्ये महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळे रूम किंवा वॉर्ड करण्यात येतील. तसेच यात अंतरही ठेवले जाईल. जर यासाठी काही नियम बदलावे लागले तर तेही आम्ही बदलू. तसेच या सर्व घटनांना जे जबाबदार आहे, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रात सर्वाधिक टेस्ट
देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सल्ल्याचा आम्ही स्वागत करतो. आम्ही टेस्टिंग लॅबची संख्या वाढवत आहोत. तसेच अँटिजेन टेस्टही प्रत्येक जिल्ह्यात वाढवत आहोत. उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक टेस्ट करत आहोत. तसेच याबाबतची पूर्ण पद्धत पारदर्शी आहे, असा राजेश टोपे यांनी सांगितले. तसेच विरोधी पक्षाने त्यांचं काम करावे. त्यात राजकारण नको. चांगल्या सूचनांचं आम्ही स्वागत करतो. त्यावर कामही केले जाईल, असे सांगत फडणवीस यांच्या टीकेला उत्तर दिले.