माणिकबापू झेंडे-पाटील
तालुकाध्यक्ष ,राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, पुरंदर
संपूर्ण राज्यातील एकमेव वादळी व्यक्तिमत्व म्हणजेच अजितदादा. विरोधाला विरोध न करता विकासकामांची आस असलेले दादा राज्याला परिचित आहेत. त्यातून त्यांच्या दूरदृष्टीचा ध्यास दिसून येत आहे. गेल्या 30 ते 35 वर्षांतील त्यांचा राजकीय प्रवास सर्वांना थक्क करणारा आहे. निर्णय घेताना त्यांचा जसा कठोरपणा दिसतो. तसा ते स्वभावाने हळवे आहेत. त्यांच्यातील गुणांची पारख कार्यकर्त्यांना आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सन्मानाने वागविणारे दादा आमच्यासाठी प्रेरणास्त्रोत आहेत.
विकासाभिमुख आणि लोकाभिमुख व्यक्तिमत्व म्हणून दादांनी आपल्या राज्यात कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. कोणाताही निर्णय घेताना तो जनहिताचा असेल तर त्याची तत्परतेने अंमलबजावणी करतात. कोण नाराज होईल याचा जराही विचार करीत नाहीत. अधिकाऱ्यांना लोकहिताची कामे मार्गी लावण्यासाठी रेटा लावतात. यातून त्यांची समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत योजना, कामे पोहोचली पाहिजेत, हा हेतू असतो. सर्वांना एकच न्याय, ही दादांची जमेची बाजू आहे.
त्यामुळे दादा कोणत्याही कार्यकर्ते आणि नेत्यांवर अन्याय होऊ देत नाहीत. त्यातून त्यांची काम करण्याची पद्धत कार्यकर्त्यांनी पाहिली आहे. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता हा आपला पक्षाचा मावळा आहे. त्यांना त्यांनी सन्मान आणि आदर दिला आहे. प्रसंगी त्यांच्यातील नेतृत्वक्षमता पाहून राष्ट्रवादीत मोठी पदे देऊन एक राजकीय ऊर्जा दिली आहे.
दादांकडे आम्ही पदाधिकारी या नात्याने कामे घेऊन गेलो तर ते प्रलंबित कामांवर आग्रहाने बोलतात. रखडलेल्या कामांविषयी अधिकाऱ्यांना सूचना करतात. नाझरे प्रकल्पाचा प्रश्न असो, शेतीच्या पाण्याचा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आदी प्रत्येक घटकांवर पुरंदर तालुक्याला न्याय देण्यासाठी प्रयत्न करतात. स्वच्छ आणि आदर्शवत प्रतिमा ही दादांची बलस्थाने आहेत.
या बळावर त्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचा कार्यभार हाती घेतला. त्यानंतर दादांनी बॅंकेचा अर्थकायापालट केला आहे. शेतकऱ्यांना विनाव्याज तीन लाखांचे कर्ज उपलब्ध करून देणारी बॅंक म्हणून राज्यात लौकीकास पात्र ठरली आहे. आशिया खंडातील सर्वांत मोठी पिंपरी महापालिकेत दादांनी विकासकामांचा ठसा उमटविला आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काम करताना त्यांची लोकहिताशी सामाजिक नाळ जुळली आहे. तशी शहरीकरणाचा चेहरामोहरा बदलण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
ग्रामीण भागातील आणि निमशहरी भागातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करून योजना आखण्यासाठी दादांची दूरदृष्टी वाखाणण्यासारखी आहे. पुढील 25 ते 50 वर्षांचा विचार करणारा जाणता नेता म्हणजेच दादा, अशी प्रतिमा त्यांनी निर्माण केली आहे.
जेजुरी नगर परिषदेसाठी इमारत, जानाई- शिरसाई योजना, पुरंदर उपसा जलसिंचन योजना, औद्योगिक वसाहतीमध्ये तरूणांना रोजगारांच्या संधी, ठिबक सिंचनासाठी वाढीव अनुदानाचा प्रश्न आदी घटकांवर त्यांचा ध्यास सर्वांना थक्क करणारा आहे. दुष्काळी पुरंदर तालुक्यात काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांनी पाणीटंचाईवर मात करून फळबागा फुलविल्या आहेत. या कष्टकरी शेतकऱ्यांना उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी दादांची धडपड सर्वांसाठी आशावादी आहे.
-शब्दांकन : चंद्रकांत चौंधकर