अजितदादा : शहराच्या विकासाला दिशा देणारे दूरदर्शी नेतृत्व
शहराच्या विकासाला दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने शहराचा चेहरामोहरा बदलला. “गाव ते शहर’ अशी पिंपरी-चिंचवडची वाटचाल राहिली आहे. कामगारनगरी म्हणून परिचित असलेल्या पिंपरी-चिंचवडचा मूळ गावचा तोंडवळा बदलून त्याला शहरीकरणाचा बाज देतानाच उद्योगनगरी बनविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य अजितदादांच्या खमक्या नेतृत्वामुळेच शक्य होऊ शकले. प्रशस्त रस्ते, प्रत्येक प्रभागात उद्यान, उड्डाणपुलांचे जाळे, पुरेशा प्रमाणात पायाभूत आणि मूलभूत सुविधांनी पिंपरी-चिंचवड शहराला अल्पावधीतच देशातील सर्वाधिक विकसित शहरांच्या यादीत अग्रक्रमावर आणून ठेवले. शहराच्या या विकासाला मूर्तरूप देण्याचे श्रेय फक्त आणि फक्त दादांनाच जाते, हे एक निर्विवाद सत्य आहे.
कोणत्याही शहराच्या विकासाचा वेग हा राजकीय इच्छाशक्ती आणि प्रशासनाकडून गतिमान पद्धतीने काम करून घेण्याची धमक यावरच अवलंबून असते. सध्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजप सत्ताधारी आहे. मात्र, त्यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसने सत्तेच्या माध्यमातूनच शहरामध्ये विकासाची गंगा आणली. शहरात उभे राहिलेले उड्डाणपूल, प्रशस्त रस्ते, जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील ग्रेडसेपरेटर, विविध विकास प्रकल्प यांच्या माध्यमातून शहराचा चिरस्थायी विकास केला.
पुणे-नाशिक महामार्गावरील उड्डाणपूल, विविध बीआरटीएस रस्त्यांचा झालेला विकास, चोवीस तास पाणीपुरवठा योजना, आंद्रा व भामा आसखेड धरणातून 267 दशलक्ष लिटर पाणी उचलण्याचा प्रकल्प, पवना धरणातून थेट जलवाहिनीद्वारे पाणी उचलण्याची योजना, मेट्रो, पुणे-मुंबई महामार्ग आणि पुणे-नाशिक महामार्ग यांना जोडणारा महत्त्वाकांक्षी स्पाइन रस्ता, चिखलीतील संतपीठ, स्वस्त घरकुल योजना आदी प्रकल्पांचे नियोजन राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात झाले. त्यातील बरेच प्रकल्प प्रत्यक्षात आले. काही प्रकल्पांवर काम सुरू झाल्यानंतर सत्ताबदल झाला. मात्र भाजपाच्या सत्तेला येऊन साडेतीन वर्षे झाली. राष्ट्रवादीने आपल्या काळात हाती घेतलेले आणि शहराच्या विकासात महत्त्वाचे योगदान देऊ शकणारे एकही विकासकाम सध्याच्या सत्ताधाऱ्यांना पूर्ण करता आले नाही, हे या शहरातील नागरिकांचे दुर्दैवच म्हणावे लागेल.
चोवीस तास पाणीपुरवठा योजना अद्याप अपूर्णावस्थेत आहे. आंद्रा व भामा आसखेड धरणातून पिंपरी-चिंचवड शहरासाठी पाणी उचलण्याचा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आणखी किती वर्षांचा कालावधी लागणार याचे सत्ताधाऱ्यांकडे उत्तर नाही. पवना धरणातून थेट जलवाहिनीद्वारे पाणी उचलण्याची योजना सध्या बारगळलेली आहे. पवना नदी सुधार प्रकल्पाचे भवितव्य अधांतरी आहे. खोटे आश्वासन देऊन सत्ता मिळविलेल्या भाजपाला शहरातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न सोडविता आलेला नाही. शास्तीकरावरूनही भाजपाने शहरवासीयांची फसवणूकच केली. केंद्रात सत्ता असतानाही शहरातील रेडझोन हद्दीत येणाऱ्या बांधकामांना अद्याप दिलासा मिळालेला नाही. अशा विविध अपूर्ण प्रकल्पांना पूर्ण करण्यासाठी आवश्यक गती देण्याचे काम केवळ अजितदादाच करू शकतात याची माझ्यासह तमाम पिंपरी-चिंचवडकरांना खात्री आहे.
अजितदादांनी शहराच्या सौंदर्यात भर घालणारे अनेक प्रकल्प प्रभावीपणे राबविल्याने आज शहराचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. सकाळी सात वाजताच प्रकल्पाला भेट देणारा नेता आणि त्यांच्या मागे धावणारा अधिकारी वर्ग असे चित्र पिंपरी-चिंचवडकरांनी यापूर्वी अनेकवेळा अनुभवले आहे. असा नेता अभावानेच आढळत असतो. पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो तो अजितदादांच्या कठोर परिश्रमामुळेच. शहराने दादांवर भरभरून प्रेम केले; त्याचप्रमाणे शहरानेदेखील त्यांच्यावर दाखविलेला विश्वास त्यांनी विकासकामांच्या माध्यमातून सार्थ ठरविला हे तितकेच खरे. कार्यक्षम लोकांना बळ देऊन, शहराचा विकास करण्यासाठी दादांनी केलेले प्रयत्न पिंपरी-चिंचवडकरांनी पाहिले आहेत.
महापालिका हद्दीत सहभागी झालेल्या 18 गावांमधील मिळकतकराचा प्रलंबित प्रश्न दादांनी एका बैठकीत मार्गी लावला, हे येथे आवर्जून सांगावेसे वाटते. अगदी विरोधी पक्षाचा कार्यकर्ता असला, तरीदेखील त्याला टाळायचे नाही. एखाद्या कार्यक्रमप्रसंगी विरोधक आंदोलनकर्त्यांची भेट घेत, त्यांचे निवेदन स्वत: स्वीकारल्याचे अनेक प्रसंग शहराने पाहिले आहेत. अशा त्यांच्या निडर प्रवृत्तीमुळे विरोधकांनादेखील त्यांचाबद्दल असलेला आदरभाव दुणावतो. पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीलगत असलेल्या देहू-आळंदी या दोन तीर्थक्षेत्रांचे महत्त्व लक्षात घेत, निगडी येथील भक्तीशक्ती उद्यानाची निर्मिती केल्याने हे समूह शिल्प आज शहराची ओळख बनले आहे. या ठिकाणी उभारलेला तिरंगा ध्वज अभिमानाने फडकत आहे. याशिवाय आळंदी-पुणे रस्त्यावरदेखील दादांच्या दूरदृष्टीतूनच संत नामदेव- संत ज्ञानदेव भेट समूह शिल्प साकारण्याचे काम हाती घेण्यात आले होते. भाजपाच्या साडेतीन वर्षांच्या सत्तेत हे शिल्पदेखील सत्ताधाऱ्यांना पूर्ण करता आले नाही. अजित दादांच्या दूरदृष्टीतून मोशी येथे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राची पायाभरणी करण्यात आली होती. मात्र नाकर्ते ठरलेल्या सत्ताधाऱ्यांना हे कामदेखील पूर्ण करता आले नाही.
राज्यात उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या दादांचा आज वाढदिवस. पिंपरी-चिंचवड आणि येथील विकास हा दादांचा जिव्हाळ्याचा विषय. सत्तेत परतलेल्या दादांनी शहराकडे पुन्हा लक्ष देण्यास सुरुवात केली हे येथे वेगळे सांगण्याची गरज नाही. ज्या दादांनी पिंपरी-चिंचवड शहराला “बेस्ट सिटी’ बनविले ते दादाच शहराला “स्मार्ट सिटी’ बनविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. शहराचे गेल्या पाच वर्षांत राज्य शासनाकडे प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी दादांनी पुन्हा पुढाकार घेतल्याने शहराचा भाजपाच्या काळात निस्तेज झालेला विकासाचा वेग पुन्हा वाढेल याची मला खात्री आहे.
करोनाकाळात देखील दादांनी पिंपरी-चिंचवडकरांनी घेतलेले निर्णय हे निश्चित स्वागतार्ह आणि अभिमानास्पद आहेत. रेडझोनमधून शहर बाहेर येताच शहरवासीयांना लॉकडाऊनमधून दिलासा देण्याचे पहिले काम दादांनी केले. शहरातील कारखाने सुरू झाले पाहिजेत यासाठी स्वत: लक्ष घालून कामगारांच्या हाताला काम देण्यासाठी त्यांनी स्वत: प्रयत्न केले. याशिवाय शहरातील करोनाच्या परिस्थिती आजही ते रोज लक्ष देऊन आहेत. उपमुख्यमंत्री या नात्याने त्यांच्यावर संपूर्ण राज्याची जबाबदारी आलेली असताना त्यांनी गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत घेतलेले धडाडीचे निर्णय हे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचाऱ्यांना आणि प्राथमिक शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ देणारा धडाकेबाज निर्णय अजितदादांनी घेऊन दाखविला.
राज्यातील सातव्या वेतनआयोगाचा लाभ देणारी पिंपरी-चिंचवड ही पहिली महापालिका ठरली आहे.
स्मार्ट सिटी असो वा मेट्रोचा प्रकल्प, अनधिकृत बांधकामे असो अथवा शास्तीकराचा प्रश्न दादांच्या माध्यमातून सोडविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस कटिबद्ध आहे. आता महापालिकेत भाजपाची सत्ता असली तरी राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांची सत्ता असल्याने पिंपरी-चिंचवडच्या विकासाची घोडदौड कायम टिकविण्यासाठी अजितदादांनी शहरात जातीने लक्ष घातले आहे. त्यांच्या माध्यमातूनच शहराची स्मार्ट सिटीच्या दिशेने होणारी वाटचाल अधिकाधिक वेगवान होऊ शकेल, याची आम्हाला खात्री आहे.
कठोर निर्णक्षमता, तितकाच आपलेपणा बाळगणाऱ्या, विकासाची दूरदृष्टी बाळगणाऱ्या आणि शिस्तबद्ध कामामुळे “उपमुख्यमंत्री’ पदाला देखील वेगळे वलय आणि प्रतिष्ठा प्राप्त करून देणाऱ्या आदरणीय दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
– संजोग वाघेरे. शहराध्यक्ष, पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी कॉंग्रेस