नवी दिल्ली – कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांची मोदी सरकारवरील टीकास्त्र सुरूच असून त्यांनी भाजपच्या खोटेपणाबद्दल भाष्य करीत त्यांच्या या कार्यपद्धतीचा देशाला मोठा फटका बसेल असा इशारा दिला आहे. आपल्या ट्विटर अकौंटवर त्यांनी म्हटले आहे की, भाजपने खोटेपणाला संस्थात्मक दर्जा दिला आहे. त्याची तीन प्रमुख उदाहरणे आहेत.
पहिले म्हणजे त्यांनी करोनाच्या बाबतीतही लपवाछपवी केली. त्यांनी चाचण्यांचे प्रमाण कमी करून मृत्यूंच्या संख्येबद्दलही खोटी माहिती दिली, त्यांनी जीडीपी मोजण्याच्या पद्धतीत बदल करून जीडीपीचे आकडेही खोटेपणाने फुगवले, आणि तिसरे म्हणजे त्यांनी चिनी आक्रमणच्या विरोधात लढण्याऐवजी त्याविषयी माहिती देणाऱ्या प्रसार माध्यमांच्याच विरोधातच लढाई करण्यात धन्यता मानली.
या ट्विटला जोडून त्यांनी भारतातील करोनाच्या संबंधात वॉशिंग्टन पोस्ट मध्ये आलेल्या लेखाचे कात्रणही जोडले आहे. त्यात भारतातील करोना रूग्णांची संख्या 10 लाखांच्यावर गेली असून मृत्यूंच्या आकड्या बाबतही भारताने लपवाछपवी चालवली असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
राहुल गांधी यांनी अलिकडेच एक व्हिडीओ जारी करून भाजपच्या विदेश नितीवर तसेच भारताच्या विविध क्षेत्रातील पडझडीबद्दल मोदी सरकारला लक्ष्य करणारे भाष्य केले होते. भारत सर्वच बाजूंनी कमजोर झाल्याने आणि भारताचे अन्य देशांशी असलेले संबंधही बिघडल्याने चीनने भारतावर आक्रमण करण्याची संधी साधली आहे असा आरोप केला होता.