नवी दिल्ली – कॉंग्रेसचे आमदार फोडण्याबाबत भाजप व कॉंग्रेस बंडखोर आमदारांमध्ये झालेल्या दूरध्वनी चर्चेच्या ज्या ध्वनिफिती प्रसारीत झाल्या आहेत त्यावरून भाजपने कॉंग्रेसवर आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. तथापि, हा फोन टॅपिंगचा प्रकार बेकायदेशीर आहे असा भाजपने केलेला आरोप म्हणजे सरकार पाडण्याच्या कटाचीच एकप्रकारे कबुली आहे असा पलटवार कॉंग्रेसने केला आहे.
आज पत्रकार परिषदेत बोलताना पक्षाचे प्रवक्ते पवन खेरा यांनी म्हटले आहे की, कॉंग्रेसच्या बंडखोर आमदारांना भाजप शासित हरियाना राज्यातील हॉटेलांमध्ये लपवून ठेवण्यात आले आहे, त्यातूनही सरकार पाडण्याच्या कटात भाजपचा पूर्ण सहभाग असल्याची बाब सिद्ध होत आहे असेही खेरा यांनी म्हटले आहे.
भारतीय जनता पक्षाने दिवसा ढवळ्या केलेला हा लोकशाहीचा खून आहे, या प्रकारामागे भाजपचा जो हात आहे त्यातील प्रत्येक पदर रोज उलगडला जात आहे आणि त्यांचा खरा चेहरा उघड होत आहे असे ते म्हणाले. त्यांची तक्रार एवढीच आहे की आम्ही लोकशाहीची हत्या करीत असताना त्याचे पुरावे तुम्ही का गोळा केले.