-डॉ. हीरा लाल, सनदी अधिकारी
कोविड-19 मुळे उद्भवलेली परिस्थिती आणि त्याबरोबरच लॉकडाऊनमुळे घसरलेली अर्थव्यवस्था सावरण्याची दुहेरी कसरत करीत असलेल्या सरकारला व्याघ्र गणनेच्या बाबतीत मात्र एक दिलासादायक यशही या काळात मिळाले आहे. व्याघ्र गणनेच्या बाबतीत सरकारने एक विक्रम नोंदविला आहे, असे केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. वास्तविक, भारताने जंगलांमध्ये कॅमेरे बसवून वाघांची गणती करण्याचा जो जागतिक विक्रम प्रस्थापित केला, त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्मध्ये करण्यात आली आहे.
अखिल भारतीय व्याघ्र गणना 2018-19 ची नोंद गिनीज बुकात “जगातील सर्वांत मोठे कॅमेरा ट्रॅपिंग वाइल्ड लाइफ सर्वेक्षण’ म्हणून केली आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्च्या अधिकृत वेबसाइटवर म्हटले आहे की, भारतात 2018-19 मध्ये झालेला कॅमेरा ट्रॅपिंग सर्वेक्षणाचा चौथा टप्पा म्हणजे संसाधने आणि माहितीच्या संदर्भात जगातील आजअखेरचे सर्वांत व्यापक सर्वेक्षण होय.
वास्तविक, हे यश मिळविण्यासाठी सरकारने बरेच प्रयत्न केले. सुमारे 1.21 चौरस किलोमीटरच्या व्यापक आणि विशाल जंगलात वेगवेगळ्या 141 ठिकाणी 26 हजार 838 कॅमेरे बसविण्यात आले. या कॅमेऱ्यांमध्ये जी चित्रे टिपली गेली, त्या आधारावर वाघांची नेमकी संख्या शोधण्यात आली. सर्वेक्षणाच्या चौथ्या टप्प्यानंतर असा निष्कर्ष काढण्यात आला की, सध्या भारतात 2 हजार 967 वाघ अस्तित्वात आहेत. ही संख्या जगभरात अस्तित्वात असणाऱ्या एकूण वाघांच्या संख्येच्या 75 टक्के भरते.
सर्वेक्षणाची प्रक्रिया सोपी निश्चितच नव्हती. वाघांची गणना करण्याच्या पारंपरिक पद्धतींना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली. प्रचंड मोठे मनुष्यबळ रात्रंदिवस वाघांच्या हालचाली टिपत राहिला. वेगवेगळ्या ठिकाणांहून सुमारे चार कोटी छायाचित्रे एकत्रित करण्यात आली. त्यांचे सूक्ष्म विश्लेषण करण्यात आले. तेव्हा जो आकडा हाती आला, तो पाहून भारताच्या या प्रयत्नांची प्रशंसा जगाने केली. भारतातील परिस्थिती “टायगर जिंदा है’ अशी आहे की “एक था टायगर’ अशी आहे, अशी जी दोलायमान मनःस्थिती होती ती एका कठीण शास्त्रीय सर्वेक्षणाने पूर्णपणे दूर केली आहे.
आमच्या या राष्ट्रीय प्राण्याचे संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या बाबतीत आम्ही गंभीर आहोत आणि त्यांची संख्या वाढविण्यासाठी वास्तवात प्रयत्न केले जात आहेत, हे आज आपण जगाला सांगू शकतो. वास्तविक वाघांची अवैध शिकार आणि त्यांची मोजदाद करताना उपस्थित होत असलेल्या अनेक शंका या पार्श्वभूमीवर आपली ही राष्ट्रीय ओळख संपुष्टात तर येत नाहीये ना, अशी साधार भीती निर्माण झाली होती. भारतात परंपरागत, आधुनिक आणि अन्य पद्धतींनी जी आकडेवारी एकत्रित करण्यात आली, त्यातून वाघांची एकूण संख्या 2 हजार 602 ते 3 हजार 346 च्या दरम्यान असल्याचे स्पष्ट झाले. त्याची सरासरी काढून भारतात वाघांची एकूण संख्या 2 हजार 967 असल्याचे मानले गेले.
जगभरातील वाघ संकटग्रस्त असल्याच्या पार्श्वभूमीवर 2010 मध्ये भारत, रशिया, चीन, नेपाळ, भूतान, थायलंड, बांगलादेश, लाओस, म्यानमार, मलेशिया, इंडोनेशिया आणि व्हिएतनाम या बारा देशांनी रशियातील सेंट पीट्सबर्ग येथे असे निश्चित केले होते की, 2022 पर्यंत वाघांची संख्या दुप्पट करण्याचा प्रयत्न केला जावा. विशेष बाब अशी की, भारताने आपले उद्दिष्ट चार वर्षे आधीच पूर्ण केले आहे. अर्थात, हे यश काही लोकांच्या पचनी पडलेले नाही.
व्याघ्रगणनेच्या पद्धतीत केलेल्या बदलांवर सवाल उपस्थित करण्यात आले. वास्तविक, 2014 मध्ये जी गणना करण्यात आली होती, त्यात ज्या वाघांचे वय 18 महिने किंवा त्याहून अधिक आहे, त्यांचीच मोजदाद करण्यात आली होती. परंतु 2018-19 च्या गणनेत 12 महिन्यांपेक्षा अधिक वय असलेल्या वाघांची मोजदाद केली गेली. या बदलामुळे बऱ्याच बाबी बदलून गेल्या असे सांगितले जाते. कारण 18 महिन्यांपेक्षा कमी वयाच्या वाघांचे मृत्यूचे प्रमाण अधिक असते. अशा स्थितीत जर 2014 च्या धर्तीवर वाघांची गणना केली असती, तर सुमारे 200 चा फरक पडला असता.
वाघांची कमाल संख्या 3 हजारपेक्षा अधिक भरल्याच्या घटनेमुळे आता वाघांची संख्या वाढविण्याचे प्रयत्न थांबवायला हवेत, या चर्चेलाही सुरुवात झाली. विकासाच्या गरजा लक्षात घेता अधिकाधिक जमिनीची गरज आहे आणि त्यामुळे वाघ आणि मनुष्यांमध्ये संघर्षाचे प्रकार वाढले आहेत, असे सांगितले जाऊ लागले. संरक्षित क्षेत्रात वाघांचे संगोपन अधिक योग्य प्रकारे करून या समस्येवर तोडगा काढता येऊ शकतो. वाघांची संख्या अधिक असल्यामुळे जैवविविधतेच्या वाढीला प्रोत्साहन मिळू शकते. तसेच माणसाचे पाणी, जंगल आणि जमिनीशी असलेले नाते आणखी दृढ होऊ शकते. अनियंत्रित आचरणामुळे कोविड-19 सारखी जी संकटे माणसावर चाल करून येत आहेत, त्यापासूनही मुक्ती मिळू शकेल.