कवठे – मास्क न लावता आणि दुचाकीवर डबल सीट फिरताना दिसल्यास बेधडक कारवाई करण्यात यावी, कारवाई करताना कोणी अरेरावीची भाषा वापरली तर त्याच्यावर ताबडतोब गुन्हे दाखल करावेत. ग्रामरक्षक समितीने प्रशासनाला सहकार्य करून करोनोची साखळी तोडण्यास मदत करावी, असे आवाहन वाईचे तहसीलदार रणजीत भोसले यांनी ओझर्डे गणाच्या बैठकीत बोलताना केले.
वाईचे तहसीलदार रणजीत भोसले व वाई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उदय कुसुरकर यांनी करोनाला रोखण्यासाठी प्रत्येक पंचायत समिती गणामध्ये तातडीच्या दररोज बैठकांचा सपाटा सुरु केला असून या गणांमध्ये येणाऱ्या सर्व गावातील ग्रामरक्षक समिती, पोलीस पाटील, गावकामगार तलाठी, सर्कल, आरोग्यरक्षक, आशाताई आणि भरारी पथकातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकांचे आयोजन केले आहे. आपापल्या गावातील पुणे, मुंबईमधून व इतर जिल्हा, राज्यांतून येणाऱ्या नागरिकांचे निःपक्षपातीपणे संस्थात्मक विलगीकारण करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामरक्षक समितीला स्वतंत्र अधिकार दिले आहेत. त्या अधिकाराचा वापर करून गावामध्ये करोनाचा फैलाव होऊ नये या जबाबदारीची गांभीर्याने दखल घेऊन सर्वांनी काम केल्यास करोनोची साखळी तोडण्यास आपल्या सर्वाना नक्कीच यश येईल, असे त्यांनी सांगितले. वाई शहरासह गावांमध्ये प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे.
ग्रामरक्षक समित्यांनी लॉकडाऊन शिथिलतेचा गैरफायदा घेऊन बाहेरून आलेल्या नागरिकांवर कारवाई न केल्यामुळे व प्रशासनाने दिलेल्या अधिकाराचा वापर करण्याकडे गांभीर्याने न बघितल्याने परगावहून आलेले नागरिक राजरोसपणे घरात राहून गावांमध्ये व शहरात फिरत राहिले. अशा लोकांवर वेळीच कारवाई झाली असती तर आज करोनाचा गावोगावी फैलाव झाला नसता, असे त्यांनी स्पष्ट केले.
दंडाची रक्कम न भरल्यास मिळकतीवर बोजा दाखल होणार
विनामास्क फिरताना आढळल्यास, दुचाकीवर डबलसिट दिसल्यास, कंटेनमेंट झोनबाहेर फिरताना आढळल्यास अशा व्यक्तींवर पहिल्यांदा 500 तर दुसऱ्यांदा 1000 रुपये दंड वसूल करावा व अशा लोकांनी दंड भरण्यास नकार दिल्यास त्यांच्या मिळकतीवर दंडाच्या रकमेचा बोजा चढविण्यात यावा. तिसऱ्यांदा त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशा सूचना तहसीलदार रणजीत भोसले यांनी दिल्या.