नितीन राऊत
वडूज -सध्याच्या तरुण पिढीला उच्चशिक्षण घेऊन नोकरीच्या मागे धावण्याची ओढ लागलेली असाताना वडूज येथील रणजित आनंदराव गायकवाड याने उच्च शिक्षण घेऊनही चांगल्या पगाराच्या नोकरीला रामराम करून वडिलोपार्जित शेतीमध्ये विविध प्रयोग राबवून सेंद्रिय शेती व त्यावर आधारित शेतीपूरक उद्योगातून प्रगतीचा नवा मार्ग निवडून युवकांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
रणजितने कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी. टेक पदवी संपादन केली. त्यानंतर राजमाची येथील दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयात काही काळ प्राध्यापक म्हणून नोकरीही केली. परंतु, लहानपणापासून धडपड्या स्वभाव असलेल्या रणजितचे नोकरीमध्ये मन रमले नाही. काहीतरी वेगळे करण्याच्या ध्यासाने आपल्या शेतीतच विविध प्रयोग करण्याची कल्पना सुचली. त्याने आपल्या कल्पना वडिलांना सांगितली. रणजितचे वडील आनंदराव गायकवाड वडूज पंचक्रोशीत प्रगतीशील शेतकरी म्हणून परिचित आहेत. त्यांनीही रणजितला हवं ते करण्याची मुभा देऊन पाठिंबा दिला.
त्यानंतर रणजितने स्वमालकीच्या दोन एकर शेतीमध्ये देशी पुन्ड्या उसाची लागवड केली. शेती करताना ती पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने करण्यावर भर दिला. त्याने उसासाठी कोणतेही रसायन न वापरता सेंद्रिय पद्धतीने उसाची मशागत केली. ऊस तयार झाल्यावर रसवंतीगृह टाकून शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी त्याने व्यवसायास प्रारंभ केला.
करोनामुळे लॉकडाऊन झाल्याने रसवंतीगृहाचा व्यवसाय एक-दोन आठवड्यातच बंद झाला. त्यामुळे शेतातील ऊसाचे काय करायचे असा प्रश्न निर्माण झाला. पण अशाही परिस्थितीत गांगरून न जाता पर्याय शोधायला सुरुवात केली. आणि ऊसापासून कोणतीही रसायने न वापरता सेंद्रिय पद्धतीने गुळ व काकवी तयार करण्याचे ठरवले. रणजितने मित्र, शिक्षक,कृषीतज्ज्ञांशी चर्चा करून पुन्ड्या उसापासून गूळ बनविण्याचा पद्धतीची माहिती घेतली.
गुऱ्हाळघराची अडचण वडूजमधील प्रगतशील शेतकरी हिंदूराव गोडसे यांच्या सहकार्याने दूर झाली. अनेक अडचणींवर मात करून रणजितने पुण्ड्या उसाचा गूळ आणि काकवी तयार केली. राज्याचे साखर संचालक उत्तम इंदलकर, सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी (वसुंधरा विभाग) ज्ञानेश्वर बोटे, कृष्णा इंदलकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
कष्टाने मिळवले यश
रणजितने पुण्ड्या ऊसापासून तयार केलेल्या गूळ व काकवीला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. 4000 किलो गूळ व 1500 लीटर काकवीच्या विक्रीतून रणजितने पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले. या संपूर्ण व्यव्यसायाला त्याला अंदाजे दीड लाक रुपये खर्च आला. कष्टाने नाविन्यपूर्ण उपक्रमातून रणजितने अल्पावधीतच साडेतीन लाख रुपयांचा नफा मिळविला. त्याबद्दल त्याचे पंचक्रोशीत अभिनंदन होत आहे.