मुंबई: करोना रुग्णांना उपचारासाठी मुंबईतील खासगी रुग्णालयातील 80 टक्के बेडस् शासनाने ताब्यात घेतले आहेत. काही ठिकाणी क्षेत्रीय रुग्णालये उभारून सुविधा निर्माण केल्या आहेत. या सर्व सुविधांमध्ये रुग्णसेवेवर आता अधिक लक्ष देतानाच रुग्णवाहिका सेवेचे नियंत्रण करावे, अशा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिला.
मुंबईतील महापालिकेच्या तसेच खासगी रुग्णालयांच्या कामकाजावर देखरेख करण्यासाठी नेमण्यात आलेल्या भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांबरोबर मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, महापालिका आयुक्त आय. एस. चहल, मुंबई महापालिकेत विशेष नियुक्त असलेल्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, राज्य टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी आदी सहभागी झाले होते.
ठाकरे म्हणाले, करोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या काळात मुंबईमध्ये खाटांच्या उपलब्धतेबाबत तक्रारी येत होत्या. आता त्यांचे प्रमाण बऱ्याच अंशी कमी झाले आहे. शासनाने खासगी रुग्णालयातील 80 बेडस् ताब्यात घेतले आहेत. शिवाय काही अधिकाऱ्यांना महापालिकेच्या रुग्णालयांची जबाबदारी सोपविल्याने कामकाजात सुसूत्रता येतानाच रुग्णांना बेडस्देखील मिळत आहेत. महापालिकेने मुंबईतील 35 मोठ्या रुग्णालयातील 80 टक्के बेडस् ताब्यात घेऊन सामान्यांना ते उपलब्ध करून दिले. देशात मोकळ्या मैदानावर रुग्णालये उभारण्याचा विक्रम महाराष्ट्राच्या नावावर आहे. या अशा सुविधा निर्माण झाल्याने रुग्णांची बेडस्साठी होणारी गैरसोय टळली आहे.
करोना रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असणारा जीवनावश्यक औषधांचा साठादेखील महापालिकेकडे उपलब्ध आहे. आता सुविधा मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्या आहेत त्याचा वापर मात्र नियोजनबद्ध पद्धतीने झाला पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
आता अंतिम टप्प्यात लढाई
मुंबईत मोठ्या प्रमाणावर रुग्णवाहिका आहेत. काही खासगी संस्थांनी देखील रुग्णवाहिका भेट दिल्या आहेत. त्यांचे नियंत्रण करणारी यंत्रणा तयार करावी जेणेकरून त्या माध्यमातून नागरिकांना सेवा मिळू शकेल.
मुंबईतील जी छोटी खासगी रुग्णालये आहेत तेथे नॉन कोविड रुग्णांना सेवा मिळेल यासाठी आता प्रयत्न झाले पाहिजेत, असे सांगून ठाकरे म्हणाले की, सुविधांची निर्मिती चांगली झाली आहे. मात्र, त्या विनावापर पडून राहिल्या असे होता कामा नये. करोना विरुद्ध लढा आता अंतिम टप्प्यात आला, असे समजून जिंकण्यासाठी पावले उचलावित आणि मुंबई करोनामुक्त होईल असे लक्ष्य ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.