- इंदौरमधील महाकाल मंदिरात जात असताना घेतले ताब्यात
- पाच दिवसांच्या पाठलागानंतर मध्य प्रदेश पोलिसांनी आवळल्या मुसक्या
भोपाल/ लखनौ: उत्तर प्रदेशात पोलिसांच्या पथकावर गोळीबार करून फरार झालेला कुख्यात गॅंगस्टर विकास दुबे याला तब्बल 5 दिवसांच्या पाठलागानंतर आज उज्जैनमध्ये एका मंदिराबाहेरच्या एका धर्मशाळेमध्ये अटक करण्यात आली. मंदिराबाहेर प्रसाद विकत घेतल्यावर अणि मंदिरातील प्रवेशाचे तिकीट खरेदी केल्यावर त्याला ताब्यात घेण्यात आले. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी ही माहिती दिली. दुबेच्या दोन सहकाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे, असे मिश्रा यांनी सांगितले.
पोलिसांनी दुबेला अटक केली असून तो पोलिसांच्या ताब्यात आहे. तो स्वतःच्या कारमधून महाकाल मंदिरात आला होता. एका पोलीस शिपायाने त्याला प्रथम ओळखले. अन्य तीन सुरक्षा रक्षकांना त्याने सतर्क केले. त्यानंतर त्याला चौकशीसाठी बाजूला नेण्यात आले आणि नंतर अटक करण्यात आली, असे मिश्रा म्हणाले.
मात्र, मंदिराच्या व्यवस्थापनाने त्याच्याबाबत काही वेगळीच कहाणी ऐकवली. दुबे सकाळी मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी आला आणि त्याने पोलिसांच्या पोस्टजवळच्याच काउंटरवरून 250 रुपयांचे तिकीट विकत घेतले. त्यानंतर तो जवळच्या दुकानात प्रसाद विकत घेण्यासाठी गेला. तेथील दुकानदाराने त्याला ओळखले आणि त्याने पोलिसांना याची माहिती दिली.
तो मंदिराच्या आत जाण्यापूर्वी लगेच त्याला अटक झाली का, मंदिरातून बाहेर आल्यावर अटक झाली, हे समजू शकले नाही असे काही प्रसिद्धीमाध्यमांचे म्हणणे आहे. जेव्हा पोलिसांनी दुबेला त्याचे नाव विचारले तेव्हा तो लगेचच “विकास दुबे’ असे मोठ्या आवाजात म्हणाला. त्याबरोबर पोलीस आणि मंदिराबाहेर तैनात असलेल्या खासगी सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडले, असे सूत्रांनी सांगितले.
दुबेला सर्वप्रथम कोणी ओळखले असे विचारले असता सविस्तर चौकशी केल्यानंतर याची माहिती दिली जाईल. हा गुप्तचरांशी संबंधित विषय आहे. त्याबाबत आताच उघडपणे माहिती दिली जाऊ शकणार नाही, असे मिश्रा यांनी सांगितले. मध्य प्रदेश पोलिसांसाठी हे मोठे यश आहे. कानपूरच्या घटनेनंतर मध्य प्रदेश पोलीस हायअलर्टवर आहेत, असेही मिश्रा म्हणाले.
दुबेबाबत माहिती देण्यासाठी 5 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आलेले होते. शुक्रवारी रात्री त्याला अटक करायला कानपूरमधील चौबेपूर भागातील बिकरू गावात त्याच्या घरी गेलेल्या पोलीस पथकावर गोळीबार केल्यापासून दुबे फरार झाला होता. पोलीस पथकावर घराच्या छपरावरून गोळीबार करण्यात आला होता. या चकमकीमध्ये 8 पोलीस ठार झाले होते. ठार झालेल्यांमध्ये पोलीस उपाधिक्षकाचाही समावेश होता.
विकास दुबे हा आतापर्यंत तब्बल 60 गुन्ह्यांमध्ये मुख्य आरोपी आहे. त्यामध्ये हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यांचाही समावेश आहे. 20 वर्षांपूर्वी भाजपच्या आमदाराच्या हत्या प्रकरणातही तो मुख्य आरोपी होता. मात्र नंतर पुराव्याअभावी त्याची सुटका झाली होती.
दुबे याला अटक केल्याबद्दल मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी उज्जैन पोलिसांचे अभिनंदन केले आहे. “महाकाल मंदिरात गेल्यावर पाप धुतले जाते, असे जे समजत असतील. त्यांना महाकालची माहिती नाही. कोणत्याही गुन्हेगाराला आमचे सरकार सोडणार नाही.’असे ट्विट त्यांनी केले आहे. दुबेला उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्वाधीन केले जाणार आहे. या संदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचेही त्यांनी सांगिताले.
दोन साथीदारांचा खात्मा…
दरम्यान विकास दुबेचे आणखी दोन साथीदार उत्तर प्रदेशातल्या दोन स्वतंत्र चक्मकींमध्ये ठार झाले, असे पोलिसांनी सांगितले. बुधवारी कार्तिकेय याला फरिदाबाद येथे अटक करण्यत आली. त्याला कानपूरला आणले जात आहे. एका पोलिसाकडून पिस्तूल हिसकावून घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याला अटक करण्यात आली होती, असे
कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी सांगितले. घेऊन जाणाऱ्या दोन पोलिसांवर कार्तिकेयने गोळीबार केला होता. त्यात दोन स्पेशल टास्क फोर्सचे दोन कर्मचारी जखमी झाले होते.
चकमकीदरम्यान कार्तिकेय ठार झाला. तर कानपूरच्या चकमकप्रकरणी वॉन्टेड असलेला प्रवीण ऊर्फ बुवा दुबे हा इटवाह येथील चकमकीदरम्यान ठार झाला. त्याच्याबाबत माहिती देणाऱ्याला 50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते, असे इटवाहचे पोलीस अधिक्षक आकाश तोमर यांनी सांगितले.
कानपूरच्या चकमकीपासून पोलीस चकमकीत पाच जण ठार झाले आहेत. बुधवारी उत्तर प्रदेशात हमिरपूर इथे झालेल्या चकमकीत अमर दुबे ठार झाला. तर प्रेम प्रकाश पांडे आणि अतुल दुबे या दोघांचा 3 जुलै रोजी कानपूरमध्ये झालेल्या चकमकीत खात्मा झाला होता.
वाचवण्यासाठीची शरणागती- दिग्विजय सिंह
विकास दुबेची अटक म्हणजे त्याला उत्तर प्रदेश पोलिसांच्या चकमकीपासून वाचवण्यासाठी करायला लावलेली शरणागती वाटते आहे, अशी उपरोधित टिप्पणी कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केले आहे. माझ्या माहितीनुसार हे काम मध्य प्रदेशातील एका वरिष्ठ भाजपा नेत्याच्या सौजन्याने केले गेले आहे, असेही ते म्हणाले.
मात्र भाजपचे आमदार आणि समाजवादी पार्टीच्या प्रवक्त्यांनी विकास दुबेशी काहीही संबंध असल्याचा दावा फेटाळला आहे. या प्रकरणातील तथ्य शोधून काढण्यासाठी सीबीआय चौकशीची मागणी कॉंग्रेस नेत्या प्रियांका गंधी वढेरा यांनी केली आहे. “भयानक आणि विलक्षण अशा कानपूर हत्याकांडानंतरच्या कारवाईमध्ये उत्तर प्रदेश पोलीस पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. पुरेसा इशारा मिळाल्यानंतरही विकास दुबे उज्जैनला पोहोचतो, यातच सुरक्षा यंत्रणाच सामील असल्याचे दिसून येते, असे प्रियांका यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.