उत्तम पिंगळे
फेब्रुवारीमध्ये दणक्यात साखरपुडा होऊनही सरपंचांच्या लग्नाचा योग येत नव्हता. गावचा तरुण सरपंच वय पंचवीस (माजी सरपंचाचा मुलगा) साखरपुडा होऊनही करोनामुळे लग्न लांबत चालले होते. सरकारी आदेशानुसार पन्नासपेक्षा जास्त जणांना एका ठिकाणी बोलवता येणार नव्हते. मुलगी जवळच्या गावचीच. फक्त चार किलोमीटरचे अंतर, पण तालुका वेगळा होता. शेवटी वडिलांनी गावातल्या वडीलधाऱ्यांशी संपर्क साधून पोराच्या लग्नाचं लांबण बरं नव्हे, असा विषय काढला.
कधी नव्हे ते यावेळच्या आषाढीची वारी झाली नाही. त्यामुळे जुन्या जाणत्या बुजुर्गांनाही करोनाचे गांभीर्य समजून आले. शेवटी गावकऱ्यांनी एकमताने सांगितलं की, आम्हाला कोणालाही बोलावू नका, पण आपल्या नातेवाईकांसह साधेपणाने लग्न लावून द्या.
सरपंचांच्या वडिलांनी पलीकडे आपल्या व्याह्यांना फोन करून ही गोष्ट सांगितली. त्यांनीही गावातील वडीलधाऱ्या मंडळींशी या विषयावर गावाचीही ना हरकत मिळवली. दोन्ही गावात सांगितले की केबल टीव्हीवरून गावात लग्न दाखवले जाईल व लग्नाचे जेवण घरपोच पाठवले जाईल. आता प्रश्न होता फक्त पन्नासच नातेवाईकांना बोलावण्याचा. मग सरपंचांच्या वडिलांनी व्याह्यांना सांगितलेले, तुमचे चार-पाच लोक घेऊन माझ्या घरी या. त्यावेळी नातेवाईकांची यादी बनवू.
ठरल्याप्रमाणे सरपंचांच्या घरी मुलीचे आईवडील, मामा, काका आणि आत्या असे पाच जण आले. यांचेही पाच जण होते. सर्वांच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती. कारणही तसे होते की, साखरपुडा दणक्यात झाला होता आणि आता लग्नाला फक्त पन्नास जण बोलवायचे होते. विषय सुरू झाला आणि समजून चुकले की अगदी काठोकाठ बोलवायचे ठरवलं तरी प्रत्येकाकडे पंचेचाळीसच्या वर लोक आहेत.
एकीकडे चहापाणी सुरू होते, पण आपापसात आवाज वाढत चालला होता. दोन्हीकडे समजून आले की काही केले तरी शंभरच्या आसपास लोक जमा होतील, जे नियमाविरुद्ध होणारच. शिवाय करोनाचा धोका आहे. काही सुचत नव्हते.
एवढ्यात मुलीच्या मामाने मुलाच्या मामाला घराबाहेर बोलावले. सुमारे अर्धातास झाल्यावर ते पुन्हा आत आले. मग ते दोघेही सांगू लागले, तुम्हाला लग्न लावायचे आहे ना? सर्वजण “होय’ म्हणू म्हणाले. मग आता आम्ही काय सांगतो ते नीट ऐका. तुम्हाला अगदी रजिस्टर लग्नही चालेल ना? दोन्हीकडचे लोक क्षणभर गप्प झाले पण नंतर लगेच “चालेल’ म्हणाले.
क्षणात मुलाच्या मामाने सांगितले की, लग्नाची तारीख काढून त्यादिवशी दुपारी मुलीकडे लग्न लागेल. आम्ही फक्त पाच जण येऊ. नंतर संध्याकाळी तुमच्याकडील पाच जण आमच्या गावी येतील त्या वेळी मुलाचे रजिस्टर लग्न लावले जाईल. त्यावेळी मुलाकडचे नातेवाईक असतील. म्हणजेच सकाळी मुलीकडे धार्मिक लग्न होईल व सायंकाळी मुलाकडे रजिस्टर लग्न होऊन त्याची नोंद केली जाईल. हा तोडगा सर्वांना पसंत आला व मुलाची व मुलीची आई दोघीही स्वयंपाकघरात पुन्हा चहा पाण्याचे पाहण्याकरता गेल्या.