कोणत्याही महिन्यात रक्कम कमी किंवा जास्त करता येणार
नवी दिल्ली – अटल पेन्शन योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांना आता कोणत्याही महिन्यात योगदान कमी किंवा जास्त करता येणार आहे. ही व्यवस्था 1 जुलैपासून लागू करण्यात आली आहे. अगोदर केवळ एप्रिल महिन्यातच अशा प्रकारचा निर्णय घेता येत होता. योजनेनुसार साठ वर्षांपर्यंत केलेल्या योगदानाच्या आधारावर लाभार्थीस पेन्शन मिळते. कोणत्याही महिन्यामध्ये रक्कम कमी-जास्त करण्याचा पर्याय देण्यात आला असला तरी हा पर्याय वर्षातून फक्त एकदाच वापरता येणार असल्याचे विमा नियंत्रक अधिकारिणीने म्हटले आहे.
सध्या या योजनेमध्ये 2 कोटी 28 लाख नागरिक योगदान करीत आहेत. योगदानाची रक्कम लॉकडाऊनमुळे पगारातून कापून घेण्याचे काम 30 जूनपर्यंत थांबविण्यात आले होते. आता 1 जुलैपासून जुनी व्यवस्था पुन्हा लागू होणार आहे. 18 ते 40 वयोगटातील नागरिकासाठी ही योजना मे 2015 मध्ये सुरू करण्यात आली आहे.
या योजनेत सहभागी होऊन योगदान करणाऱ्या नागरिकांना 60 वर्षांनंतर 1,000 ते 5,000 रुपयांपर्यंतचे पेन्शन मिळू शकते. संबंधित नागरिकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीलाही पेन्शनची रक्कम मिळते. दोघांचाही मृत्यू झाल्यानंतर नामनिर्देशन केलेल्या व्यक्तीला उरलेली रक्कम दिली जाते.