कोल्हापूर(प्रतिनिधी) – कोल्हापूर जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा जोर आजही कायम आहे. सलग तीन दिवस जिल्ह्यात पडत असणाऱ्या पावसाने पंचगंगा, भोगावती, कुंभी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील राजाराम, इचलकरंजी, शिंगणापुरसह 9 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
राधानगरी, भुदरगड, चंदगड तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याने राधानगरी धरणासह सहा प्रकल्पातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सहा प्रकल्पातून प्रतिसेकंदाला 4 हजार 694 क्यूसेकचा विसर्ग नदीपात्रात सुरू असून नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. दरम्यान, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडझाप असली तरी अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. गगनबावडा, आजरा तालुक्यांसह धरणक्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. पंचगंगेची पातळी मंगळवारी 17.10 फुटांपर्यंत पोहोचली असून, नऊ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू असली तरी कोल्हापूर शहरात दिवसभर चांगला पाऊस सुरू आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील पन्हाळा, गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी, आजरा तालुक्यांत जोरदार पाऊस झाला, तर हातकणंगले, शिरोळ तालुक्यांत पावसाची नोंद आहे.