कराड – जगभरात सुमारे दोनशे देशांमध्ये करोनावर लस शोधण्याचे काम सुरू आहे. एखाद्या औषधाचे संशोधन करण्याची प्रक्रिया गुंतागुंतीची असते. तयार झालेल्या लशीची सुमारे 30 हजार लोकांवर टेस्ट घेतली जाते. ही प्रक्रिया दीड वर्षापासून पाच, दहा वर्षांपर्यंत चालते.
त्यामुळे 15 ऑगस्टपर्यंत आपल्या देशात करोनावरील लस उपलब्ध होईल, हा दावा चुकीचा असल्याचे मत माजी मुख्यमंत्री, आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. दरम्यान, करोनाच्या काळात मलकापूर नगरपरिषदेने चांगले काम केल्याचे सांगत करोना योद्ध्यांच्या पाठीवर त्यांनी शाबासकीची थाप टाकली.
आनंदराव चव्हाण व प्रेमलाताई चव्हाण यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून मलकापूर नगरपरिषदेच्यावतीने श्रीमती प्रेमलाताई चव्हाण कन्या सुरक्षा अभियानाच्या आठव्या वर्धापनदिनाचा कार्यक्रम मंगळवारी झाला.
जिल्हा परिषद सदस्य ऍड. उदयसिंह पाटील, डॉ. इंद्रजित मोहिते, नगराध्यक्ष नीलम येडगे, शिवराज मोरे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, इंद्रजित चव्हाण, वैशाली वाघमारे, विद्या थोरवडे, झाकीर पठाण, प्राचार्य प्रफुल्ल चव्हाटे, सलीम मुजावर, शंकरराव खबाले, पृथ्वीराज पाटील, हिंदुराव पाटील, राजेंद्र माने, आनंदी शिंदे, कमल कुराडे, राजेंद्र यादव, सुरेश जाधव उपस्थित होते. खा. श्रीनिवास पाटील म्हणाले, या मातीत आनंदराव चव्हाण, प्रेमलाकाकी चव्हाण, भास्करराव शिंदे यांच्यासारखी मोठी माणसे जन्माला आली. त्यांनी येथील लोकांची सेवा व परिसराचा विकास केला. त्यांच्या विचाराचा वारसा मनोहर शिंदे यांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे चालवला आहे.
गृह राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील म्हणाले, सातारा जिल्ह्यात मेडिकल कॉलेज व्हावे, हे आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे स्वप्न होते. ते आता साकार होत आहे. या कॉलेजचा पाया त्यांनी घातला असून हे कॉलेज लवकरच सुरू होईल. मलकापूर म्हणजे विकासाचा पॅटर्न. चांगले, सक्षम, विकासाची दृष्टी असणारे नेतृत्व लाभले तर काय होऊ शकते, हे मलकापूरमध्ये आल्यानंतर लक्षात येते.
ऍड. उदयसिंह पाटील यांच्या आमदारकीची चर्चा
ज्येष्ठ नेते विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आ. पृथ्वीराज चव्हाण त्यांच्या घरी गेले होते. या नेत्यांच्या विकासाच्या दृष्टीचा, विचारांचा आदर्श तरुण पिढीने घेतला पाहिजे, असे उद्गार सतेज पाटील यांनी काढले. त्यामुळे काका-बाबा गटांचा समेट आणि ऍड. उदयसिंह पाटील यांची विधान परिषदेवर वर्णी लागणार, या चर्चेने जोर धरला आहे.