मूळ संकल्पना कायम : करोनामुळे झालेले नुकसान टाळण्यासाठी निर्णय
इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
शिक्षणतज्ज्ञांच्या सूचनेवरून अभ्यासक्रम कपातीचा निर्णय
पुणे – सेंट्रल बोर्ड ऑफ सेंकडरी एज्युकेशन अर्थात “सीबीएसई’ने यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता नववी ते बारावीचा 30 टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. करोनामुळे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी आणि विद्यार्थ्यांवरील दबाव कमी करण्यासाठी “सीबीएसई’ने मोठा दिलासा दिला आहे.
चालू सत्रात अभ्यासक्रम कमी करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल (निशंक) यांनी मंगळवारी ट्विट करत दिली. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अभ्यासक्रमात सुधारणा आणि नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्याचा सल्ला देण्यात आला होता.
तसेच अभ्यासक्रम कमी करण्यासाठी शिक्षणतज्ज्ञांकडून सूचना मागवल्या होत्या. त्यास देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे,’ असे रमेश पोखरियाल यांनी ट्विट करत सांगितले. दरम्यान, मागील आठवड्यात “आयसीएसई’ बोर्डाने दहावी व बारावीचा 25 टक्के अभ्यासक्रम करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचप्रमाणे करोनामुळे शाळा ऑगस्टपर्यंत सामान्यपणे सुरू झाल्या नाहीत, तर अभ्यासक्रमात आणखी कपात करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
सुधारित अभ्यासक्रम प्रसिद्ध
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी अभ्यासक्रम कमी करण्याची घोषणा केली. त्यानंतर त्याबाबतचे परिपत्रक सीबीएसई बोर्डाचे संचालक जोसेफ इमॅन्युएल यांनी बोर्डाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. करोना संसर्गाचा विचार करून कमी केलेला अभ्यासक्रम हा अंतर्गत मूल्यमापन अथवा बोर्डाच्या अंतिम परीक्षेचा भाग होऊ शकत नाही, असेही बोर्डाने स्पष्ट केले आहे.
वेळापत्रक नव्याने करावे लागणार
एप्रिलमध्ये सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरू होतात. करोनामुळे शहरातील बहुतांश शाळांनी ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू केले आहे. अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय झाला. मात्र त्यातील काही भाग शाळांकडून शिकवण्यात आला आहे. आता पुन्हा शाळांना अध्यापनाचे नव्याने वेळापत्रक तयार करावे लागणार आहे.
सुधारित अभ्यासक्रम http://cbseacademic.nic.in/Revisedcurriculum_2021.html या लिंकवर उपलब्ध आहे.
सीबीएसई बोर्डाने 30 टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. त्यामुळे शैक्षणिक सत्र अथवा वर्ष वेळेत पूर्ण होईल. अभ्यासक्रम कमी केला, तरी परीक्षेची काठिण्यपातळी कमी होता कामा नये, हीच अपेक्षा.
– मिलिंद नाईक, प्राचार्य, ज्ञानप्रबोधिनी प्रशाला