प्रशासनाचे सरकारकडे बोट : सोमवारी एकाच दिवसात 363 रुग्णांना डिस्चार्ज
सौम्य अथवा लक्षणे नसलेल्या रुग्णांना पाच दिवसांत सोडण्यात येत आहे
– प्रकाश गायकर
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये करोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. महापालिकेच्या रुग्णालयांमधील बेडची संख्या अपुरी पडायला लागली आहे. तर प्रशासनाने करोनाबाधित रुग्णांना लवकर डिस्जार्च देण्यास सुरुवात केली आहे. ज्या रुग्णांमध्ये सौम्य अथवा लक्षणे नाहीत त्यांच्यावर पाच दिवस उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात यावे असे केंद्र सरकारचे निर्देश आहेत. त्यानुसार शहरात रुग्णांना डिस्चार्ज दिला जात आहे.
गेल्या पंधरा दिवसांत पंधराशेहून अधिक रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्यांना घरी सोडतेवेळी त्यांची पुन्हा चाचणी केली जात नाही. यामुळे करोना विषाणूचा फैलाव होण्याची शक्यता आहे. पाच दिवसांमध्ये घरी सोडण्यात आलेले रुग्ण घरातच राहतील. रुग्ण प्रशासनाच्या नियमांचे पालन करुन विलगीकृत राहत नसल्याचे समोर येत आहे.
मार्च महिन्यामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये बारा रुग्ण आढळले होते. या रुग्णांवर चौदा दिवस उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या घशातील द्रावाचे नमुने एनआयव्ही संस्थेकडे तपासणीसाठी पाठविले. त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर पुन्हा 24 तासांनी त्यांची दुसरी तपासणी करण्यात आली. त्यामध्येही तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना घरी सोडण्यात आले. तसेच त्यानंतर पुन्हा चौदा दिवस त्यांना होम क्वांरटाईन करण्यात आले. त्यामुळे पुन्हा त्यांच्यापासून संक्रमण होण्याचा धोका नव्हता. त्यानंतर जसजशी रुग्णसंख्या वाढू लागली तसे केंद्र सरकारनेच रुग्णांना घरी सोडण्याच्या निर्णयामध्ये बदल केले.
एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून रुग्णांना घरी सोडतेवेळी त्यांची तपासणी न करण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्या रुग्णांनी चौदा दिवस उपचार घेतले आहेत, व ज्यांच्यामध्ये कोणतेही लक्षणे दिसत नाहीत त्यांना घरी सोडण्यात येऊ लागले. त्यामुळे एका दिवशी करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. त्यानंतर जून महिन्याच्या सुरुवातीला सात दिवसांनंतर रुग्ण घरी सोडण्यात येऊ लागले. तर जूनच्या अखेरीस पाच दिवसांनी रुग्ण घरी सोडण्यात येत आहे. त्यामध्ये ज्या रुग्णांमध्ये लक्षणे दिसत नाहीत त्यांना घरी सोडण्यात येत आहे. याबाबत प्रशासनाने मात्र शासन निर्णयाकडे बोट दाखविले आहे. शासनाने दिलेल्या आदेशानुसारच रुग्णांना घरी सोडण्यात येत असल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.
रुग्णांना लवकर घरी सोडल्याने रुग्णसंख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अवघ्या पाच दिवसांत रुग्णांना घरी सोडल्यानंतर त्यांच्यापासून इतरांनाही संसर्ग होण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवड शहरात 21 जून रोजी 22 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यावेळी एकूण करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 1059 होती. त्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांत तब्बल 1847 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. सोमवारी एकाच दिवसात 363 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे एकूण डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या 2906 इतकी झाली आहे.
लक्षणे नसतानाही ‘पॉझिटिव्ह’
डॅशबोर्डनुसार सुमारे बाराशे रुग्णांमध्ये कोणतेही लक्षणे नाहीत. त्यांना ताप, खोकला, सर्दी यापैकी कोणताही त्रास नाही. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी बहुतांश रुग्णांमध्ये लक्षणे नसताना केवळ ते हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये आले आहेत, म्हणून त्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये ते बाधित आढळून आले. म्हणजेच लक्षणे नसलेल्या रुग्णांना पुन्हा तपासणी न करता सोडणे करोनाला आमंत्रण देण्यासारखे आहे. पाच दिवसांत डिस्चार्ज दिलेले रुग्ण इतरांच्या संपर्कात आल्यास करोनाचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सरकारने रुग्णांना घऱी सोडण्याबाबत तसे आदेश दिले आहेत. एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे, मात्र त्याला सर्दी, खोकला, ताप असे कोणतेही लक्षणे नाही. त्याचे वय कमी आहे, तसेच पूर्वीचे कोणतेही गंभीर आजार नाही अशा रुग्णांना आपण लगेचच घरी सोडतो आहे. सरकारने याबाबत तसा आदेश दिला आहे. भीतीमुळे लोक साध्या आजाराला ही करोना समजत आहेत. त्यामुळे रुग्णालयांमध्ये गर्दी वाढली आहे. ज्या रुग्णामध्ये कोणतेही लक्षणे नाहीत, त्यापासून संक्रमण होत नाही. त्यामुळे रुग्ण लवकर घरी सोडले तरी भीती नाही.
-डॉ. पवन साळवे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी.