राहुरी विद्यापीठ – भारतीय शेती हे आपल्या देशासाठी फार महत्वाची असून देशाची 85 टक्के लोकसंख्या ही शेतीशी निगडीत आहे. आपल्या देशातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न फारच कमी आहे.
यासाठी पीक पध्दतीत बदल करणे गरजेचे असून पर्यावरण पूरक पिकांचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना भात, गहू, बाजरी, बांबू यासारख्या पिकांचे महत्व पटवून द्यावे लागेल, जेणेकरुन जैव इंधनाबरोबरच बांबूसारख्या पिकांपासून तयार होणाऱ्या अगरबत्ती स्टिक्स, लोणचे, कपडे, पेपर मिलकरीता लागणारा पल्प या सारखे पदार्थ तयार करण्यासाठी छोट्या उद्योगांच्या निर्मितीद्वारे रोजगाराची साधने निर्माण होवून त्याद्वारे ग्रामीण विकास शक्य असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान तंत्रज्ञान केंद्राद्वारे आयोजीत जैवउर्जा-हवामान अद्ययावत नुतनीकरणक्षम उर्जाः सद्यस्थिती आणि पुढील दिशा या विषयावरील ऑनलाइन राष्ट्रीय वेबीनारमध्ये मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा होते. यावेळी अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अशोक ढवण, अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, संचालक संशोधन तथा विस्तार शिक्षण डॉ. शरद गडाख, सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, डॉ. प्रमोद रसाळ, डॉ. चिंतामणी देवकर, नियंत्रक विजय कोते, कास्ट प्रकल्पाचे प्रमुख शास्त्र्रज्ञ डॉ. सुनिल गोरंटीवार व सुरसिंग पवार यावेळी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी केले. तर आभार डॉ. अशोक फरांदे यांनी मानले.