आषाढी वारी : “करोना’मुळे 35 दिवसांचा प्रवास अवघ्या तीन दिवसांत आटोपला
– रामकुमार आगरवाल
श्रीक्षेत्र देहूगाव: आषाढी एकादशी सोहळा। विठ्ठल म्या देखियला डोळा।। लाखो भाविक, वारकरी, वैष्णवांच्या लवाजवाने श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळ्याचा सुमारे 35 दिवसांचा असणारा आजपर्यंतचा प्रवास अवघ्या तीन दिवसांत अटोपला. जगभर करोना महामारीची उद्रेक आहे. त्यामुळे यंदा “करोना’च्या वाढत्या संकटामुळे आषाढी पायी वारी सोहळा रद्द झाला. शासनाने घालून दिलेल्या सूचना, आदेशाचे पालन करीत मोजक्याच भाविकांसह तुकोबांचा पालखी सोहळा तीन दिवसांत गुरुवारी (दि. 2) रात्री देहूनगरीत परतला.
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा 335 वा आषाढी वारीसाठी पालखी सोहळ्याने 12 जून रोजी प्रस्थान ठेवले होते. मात्र यंदा करोनामुळे प्रस्थानानंतर पालखी मंदिरामध्येच विसावले. लाखो भाविकांचा असणारा हा सोहळा मोजक्याच भाविकांसह राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या “विठाई’ बसने पोलीस बंदोबस्तात दशमीदिनी मंगळवारी (दि. 30) दुपारी एकच्या सुमारास पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. ग्रामस्थांनी जड अंतकरणाने तुकोबांच्या पादुकांचे दूरूनच दर्शन घेत साश्रृनयनांनी निरोप दिला.
बुधवारी एकादशी दिनी पंढरपुरामध्ये विधिवत धार्मिक कार्यक्रम संपन्न झाला. मात्र त्यानंतर पौर्णिमापर्यंत मुक्कामी असणारा पालखी सोहळा पौर्णिमा दिवशी पंढरपूर प्रदक्षिणा करुन विठुरायाच्या दर्शनानंतर परतीला निघतो. मात्र यंदा करोना संकटामुळे एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या दिवशीच पौर्णिमा दिनाचे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. रात्री देहूत पालखी सोहळ्याचे पुनरागमन झाले. सोहळ्याचे (महाराजांच्या पादुका) पुनरागमन होत असताना पालखी मार्गातील चिंचोली येथील पादुका, देहूतील अनगडशावली बाबा दर्गा आणि इनामदार वाड्यासमोर आरती होऊन मुख्य मंदिरात विसावला आहे. सुमारे 35 दिवसांचा प्रवास हा यंदा तीन दिवसांतच अटोपला.
तीर्थक्षेत्र पंढरपूरमधून पालखी सोहळा तीर्थक्षेत्र देहूकडे पुनरागमन होत असताना पालखी मार्गावरील असणारे सर्व विधीवत धार्मिक कार्यक्रम मुख्य मंदिरामध्ये होणार असल्याची माहिती पालखी सोहळा प्रमुख विशाल महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज
मोरे विश्वस्त संजय महाराज मोरे, अजित महाराज मोरे यांनी दिली. दरम्यान, सोहळा सोबत पंढरपूरला जाणारे श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त, पालखी सोहळा प्रमुख, भाविक वारकरी अशा 20 जणांसह महसूल विभागाचे कर्मचारी आणि एक पोलीस अशा सर्वांना होम क्वारंटाइन करणार आहे, अशी माहिती हवेलीचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के
यांनी दिली.
यंदाच्या पालखी सोहळ्यातील वैशिष्ट्ये
* 12 जून रोजी पालखीचे प्रस्थान, मंदिरातच मुक्काम
* पालखी मार्गावरील परंपरेप्रमाणे विधीवत धार्मिक कार्यक्रम मंदिरामध्ये संपन्न
* दशमी दिनी “विठाई’ बसने तुकोबांच्या पादुका निवडक भाविकांसह देहूतून मार्गस्थ, रात्री पंढरपूरमध्ये दाखल
* पंढरपुरातील पौर्णिमेचा धार्मिक कार्यक्रम द्वादशीला संपन्न
* द्वादशीच्या दिवशी गुरुवारी (दि. 2) सोहळा देहूत परतला
* गुरुवारी रात्री मुख्य मंदिरात पादुकाचे पुनरागमन
* परतीच्या मार्गावरील विधीवत धार्मिक कार्यक्रम मुख्य मंदिरात संपन्न होणार.
* पालखी सोहळ्याची सांगता गुरुवारी (दि. 16) होणार
* 35 दिवसांच्या पालखी सोहळ्याचा प्रवास तीन दिवसांत