अधिकारी आणि रुग्णांमध्ये दररोज वाद
पुणे – करोनाबाधित मात्र लक्षणे नसलेल्या रुग्णांना महापालिकेकडून संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. मात्र, आपल्याला करोना झाला आहे, या भीतीमुळे अनेकांच्या मानसिक संतुलनावर परिणाम होत आहे. त्यांच्याकडून विलगीकरण केंद्रात गोंधळ घातला जात असल्याने वैद्यकीय कर्मचारी धस्तावले आहेत. त्यातच, या केंद्रांमध्ये सुमारे अडीचशे ते तीनशे रुग्णांसाठी एकच डॉक्टर असल्याने आपल्यावर योग्य पद्धतीने उपचार होत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
महापालिकेकडून लक्षणे नसलेल्या मात्र घरी विलगीकरणाची सोय असलेल्या रुग्णांना घरी सोडले जात आहे. मात्र, त्याचवेळी झोपडपट्टी तसेच ज्यांच्या घरी विलगीकरणाची सुविधा नाही, अशांना पालिकेच्या केंद्रांमध्ये ठेवले जात आहे. या केंद्रांमध्ये सुमारे चारशे ते पाचशे जण एकाच इमारतीत ठेवण्यात येतात. त्यातच, या इमारती महाविद्यालयांची वसतिगृहे आहेत.
परिणामी, या खोल्या छोट्या आहेत. त्यामुळे तेथे नागरिकांना एकट्याला संपूर्ण दिवस घालवावा लागत असून त्यांच्याकडे करमणुकीचे कोणतेही साधन नाही. त्यामुळे दिवस दिवस एकाच बंद खोलीत कोणाशीही संवाद न साधता राहिल्याने अनेक रुग्ण रात्री उशिरापर्यंत जागत आहेत. त्यामुळे अनेकांना या वातावरणाचा मानसिक ताण येत असून आपल्या घरी सोडावे यासाठी वाद घातला जात आहे.
डॉक्टरच घाबरताहेत…
दोन दिवसांपूर्वी अशाचप्रकारे एका केंद्रातील ज्येष्ठ महिलेने विलगीकरणात खूप गोंधळ घातला. या ठिकाणची जबाबदारी असलेल्या डॉक्टरांनी या महिलेस समजावण्याचा प्रयत्न केला. आपल्या कोणतीही लक्षणे नाहीत. त्यामुळे आपल्याला घरी सोडावे नाहीतर आपण मरून जाऊ, अशी ही महिला जोरजोरात ओरडत होती. संबंधित डॉक्टरांनी त्यांचे समुपदेशनही करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही महिला ऐकण्यास तयार नव्हती अखेर पोलिसांची भीती दाखवून या महिलेस पुन्हा तिच्या खोलीत पाठवले. हे प्रकार वारंवार घडत असून अनेक रुग्णांना समुपदेशन करण्याची गरज असल्याचे मत या डॉक्टरांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.