मुंबई: ज्या पक्षाच्या कार्यकाळात कित्येक युद्ध जिंकण्यात आली, तो पक्ष देशाच्या सुरक्षिततेच्या बाबतीत राजकारण करण्याचा प्रश्नच येत नाही, असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना कॉंग्रेसने उत्तर दिले आहे. ज्या कॉंग्रेस पक्षाने 50 वर्षांपेक्षा जास्त काळ सत्तेमध्ये घालवला, ज्या पक्षाच्या कार्यकाळात कित्येक युद्ध झाली, युद्ध जिंकण्यात आली, तो पक्ष देशाच्या सुरक्षिततेच्या बाबतीत राजकारण करतो, त्याचा प्रश्नच येत नाही, असे कॉंग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे म्हणाले.
राजू वाघमार म्हणाले, आमचे नेते राहुल गांधी तेच म्हणत आहेत. चीनने घुसखोरी केली की नाही ते सांगा, आमचे 20 जवान कसे शहीद झाले ते सांगा. कारण गृहमंत्री सांगत आहेत घुसखोरी झाली, चार दिवसानंतर पंतप्रधान सांगतात घुसखोरी झालेली नाही. तोच प्रश्न आम्ही विचारत आहोत.
शरद पवार म्हणाले 1962च्या युद्धामध्ये आपली काही जमीन त्यावेळी चीनने घेतली. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी या गोष्टी संसदेसमोर मांडल्या. आम्हीही तेच म्हणतोय तुम्ही या गोष्टी देशासमोर मांडा. असं म्हणत सैन्याच्या बाबतीत राजकारण करणे हा भाजपचा धर्म आहे, असा आरोप वाघमारेंनी केला.
पुलवामानंतर कोणी राजकारण केले असेल आणि सैन्याला पुढे करुन कोणी मतं मागितली असतील तर ती भाजपने. अशा प्रकारचे घाणेरडे राजकारण ना कधी कॉंग्रेसने केले, ना आता करत आहे, असा दावाही राजू वाघमारे यांनी केला.