नवी दिल्ली : करोनाबाधित अधिक असणाऱ्या हॉटस्पॉटमध्ये मर्यादित लॉकडाऊन, व्यापक संपर्क तपासणी या मार्गांचा अवलंब करून करोनाचा संसर्ग मर्यादित ठेवता येऊ शकेल. त्याचबरोबर जुलैच्या अखेरीस
किंवा ऑगस्टच्या सुरवातील करोनाचा प्रभाव ओसरू लागेल, अशी शक्यता ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केली.
देशातलि करोनाबाधितांच्या संख्येत सर्वाधिक वाढ असणाऱ्या दहा शहरांवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. मात्र, स्पेन इटली सारख्या युरोपीय देशांसारखी अवस्था भारताची नाही, असे डॉ. गुलेरिया यांनी
स्पष्ट केले. ते म्हणाले, बाधितांच्या संख्येत घट होऊ लागल्यानंतरही नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर आणि अन्य उपाय योजनांचा अवलंब वर्षभर करावा लागेल.
चीनमध्ये किंवा द. कोरीयात बाधित संख्या आटोक्यात आल्यानंतर मास्कचा वापर नागरिकांनी बंद केल्याने दुसऱ्यांदा तेथे साथ पसरली. 1918 मध्येही नागरिकांनी सुरक्षिततेचे उपाय बंद केल्यानंतर
विषाणूंनी दुसऱ्यांदा हल्ला केला होता. जर नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळले नाही तर बाधितांच्या संख्येत वाढ अपरिहार्य आहे. सुरक्षिततेचे हे उपाय आणखी वर्षभर तरी पाळले गेले पाहिजेत, असे त्यांनी
सांगितले.
हॉटस्पॉटमध्ये ठराविक क्षेत्रात लॉकडाऊन करावे लागेल. या प्रतिबंधित क्षेत्रातील व्यक्ती अन्य लोकांबाबत मिसळू नये यासाठी काळजी घ्यावी लागेल. लक्षणे आढळून येणाऱ्या व्यक्तींनी चाचणी करून घेतली
पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले, करोना बाधितांच्या संख्येत आणखी काही काळ वाढ होईल. त्याच बरोबर बाधित संख्या दुप्पट होण्याचा कालावधीही वाढला आहे. पण या संख्या कमी होण्यासही सुरवात होईल. त्याची सुरवात
जुलै अखेर किंवा ऑगस्टच्या सुरवातीला होईल. बाधित संख्या कमी झाली तरी लोकांनी सुरक्षिततेच्या नियम पाळायलाच हवेत असे त्यांनी आवर्जून सांगितले.