उत्पादक अडचणीत; 400 ते 550 नगांच्या गोणीला 100 ते 200 रुपये भाव
मागणी नगण्य असल्याने वाहतूक खर्चही निघेना
पुणे – करोनाचा संसर्ग वाढीस लागल्यानंतर लिंबाला मागणी वाढली होती. किरकोळ बाजारात चांगला भाव मिळत होता. मात्र, महिनाभरात लिंबाच्या मागणीत कमालीची घट झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
करोनाचा संसर्ग आणि वाहतूक बंदीमुळे एप्रिल महिन्यात लिंबाचा तुटवडा जाणवत होता. लिंबामध्ये “क’ जीवनसत्त्व असल्याने मागणीही वाढली होती. त्यामुळे किरकोळ बाजारात एका लिंबाला 5 ते 10 रुपये असा भाव मिळाला. वाहतुकीवरील निर्बंध शिथिल झाल्यानंतर मार्केट यार्डातील फळबाजारात लिंबाची मोठी आवक सुरू झाली. सोलापूर जिल्ह्यातून सध्या बाजारात लिंबाची आवक सुरू आहे. मागणी नसल्याने लिंबाच्या गोण्या बाजारात पडून आहेत. मागणी नसल्याने किरकोळ आणि घाऊक बाजारात लिंबाची कवडीमोल भावाने विक्री करावी लागत आहे.
याविषयी मार्केट यार्डातील लिंबाचे व्यापारी रोहन जाधव म्हणाले, सध्या घाऊक बाजारात 400 ते 550 लिंबे असलेल्या एका गोणीची आकारमान आणि प्रतवारीनुसार 100 ते 200 रुपयांना विक्री होत आहे. लिंबाला मागणी नसल्याने भाव कमी मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. लिंबे विक्रीतून वाहतूकखर्चदेखील निघत नाही. वाहतुकीवरील निर्बंध हटवण्यात आल्यानंतर लिंबाची आवक वाढली आहे. बाजारात लिंबे मुबलक आहेत.
मात्र, शहरातील उपाहारगृहे आणि खानावळी बंद आहेत. कवडीमोल भावात विक्री होत आहे. उन्हाळी हंगाम वाया गेल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसला. लिंबाची लागवड नगर जिल्ह्यातील राशिन, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर करतात.