वासिम जाफर मुश्ताक अली स्पर्धेसाठी आग्रही
मुंबई – करोनाचा धोका कमी झाल्यावर जर भारतातील देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा घेण्याचे निश्चित झाले तर विजय हजारे, दुलीप व देवधर करंडक स्पर्धा आयोजित करण्याचा अट्टहास करण्यापेक्षा आगामी टी-20 विश्वकरंडक स्पर्धा लक्षात घेता केवळ सय्यद मुश्ताक अली स्पर्धाच खेळविण्यात यावी, असे आग्रही मत माजी कसोटीपटू वासिम जाफर याने व्यक्त केले आहे.
मुश्ताक अली स्पर्धा टी-20 सामन्यांचीच असते. त्यामुळे ही स्पर्धा खेळण्यासाठी भारतीय संघातील सर्व प्रमुख खेळाडूंना सूचित केले गेले पाहिजे. याच स्पर्धेद्वारे कर्णधार विराट कोहली व संपूर्ण संघाला चांगला सराव मिळेल. गेल्या तीन महिन्यांपासून क्रिकेट ठप्प आहे. त्यामुळे खेळाडूंना सामने खेळणे शक्य झालेले नाहीत तसेच सरावही करता आलेला नाही. अशा स्थितीत मुश्ताक अली स्पर्धेतून खेळाडूंना सामन्यांचा अनुभव येईल व त्यांना चांगला सरावही मिळेल, असा विश्वासही जाफरने व्यक्त केला.
विजय हजारे, दुलीप व देवधर करंडक स्पर्धा लॉंगस्ट गेम म्हणून ओळखल्या जातात. त्या स्पर्धा आयोजित करून आगामी मालिकांसाठीचा सराव मिळणार नाही. दोन दिवसीय स्पर्धा खेळून खेळाडूंना टी-20 सामने खेळावे लागले तर त्यांची कामगिरी सरस होईल का, याचाही विचार केला गेला पाहिजे.
आयपीएल झाली पाहिजे….
देशांतर्गत क्रिकेटच्या मोसमात मुश्ताक अली स्पर्धेने प्रारंभ झाला पाहिजे. मात्र, आंतरराष्ट्रीय स्पर्धा लक्षात घेता आयपीएल आयोजित करण्यासाठी देखील बीसीसीआयने प्रयत्न केले पाहिजेत. जर ऑस्ट्रेलियातील टी-20 विश्वकरंडक निश्चित झाला तर मुश्ताक अली व आयपीएल स्पर्धेद्वारे खेळाडूंना विश्वकरंडक स्पर्धेची तयारी करता येईल, असेही जाफर म्हणाला.