नवी दिल्ली – लॉक डाऊनच्या देशव्यापी चार टप्प्यांनंतर देश पुन्हा एकदा सुरु करण्यासाठी अनलॉक १ ची घोषणा करण्यात आली. देशातील अनलॉक – १ ला आता दोन आठवडे उलटले असून सावधगिरी बाळगत हळूहळू सर्व व्यवहार पूर्वपदावर येत आहेत.
अशातच आज राज्यांमधील अनलॉक – १ च्या परिस्थितीबाबत आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी, “कोरोना संकटानंतर जेव्हा आपण मागे वळून पाहू तेव्हा आपल्या सर्वांचा कोरोनाविरोधात एकत्र येऊन दिलेला लढा दिसेल. भारताचा कोरोनाविरोधातील लढा हा सहकार संघराज्याचं सर्वोत्तम उदाहरण आहे,” असं सांगितलं.
यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले, “कोरोनाला जितकं रोखता येईल, त्याचा प्रसार जितका रोखता येईल, तितकीच आपली अर्थव्यवस्था खुली होत जाईल. कार्यालये, बाजारपेठा खुल्या होतील. दळणवळणाची साधनं सुरू होतील. परिणामी रोजगाराच्या नव्या संधी देखील निर्माण होतील. यामुळं कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आपल्याला सजग राहावं लागणार आहे.”
“शेतकऱ्यांच्या उत्पादनाचं मार्केटिंग करण्यासाठी सुधारणा करण्यात आल्या असून यामुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल विकण्यासाठी नवे पर्याय खुले होणार आहेत. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल व शेतीमालाच्या साठवणुकीची सुविधा नसल्यानं शेतकऱ्यांचं जे नुकसान होत होतं, तेही आपण कमी करू शकू,” असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.