नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधितांचे आकडे झपाट्याने वाढत आहेत. हि चिंतेची गोष्ट असली तरी एक दिलासादायक बाब समोर आली आहे. देशात अजून सामुदायिक संसर्ग (community transmission) झाला नसल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (ICMR) सांगण्यात आले आहे. मुंबई, दिल्लीसह देशातील काही महत्वाच्या शहरांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अचानक झपाट्याने वाढू लागल्याने देशात कोरोनाचा समूह संसर्ग सुरु झाला असल्याचे बोलले जात होते. यावर देशातील लोकसंख्येनुसार एक टक्क्यांहून कमी लोकांपर्यंत कोरोनाचा संसर्ग झाला असल्याने, देशात कोरोनाचा समूह संसर्ग झाला असल्याचे म्हणणे चुकीचे असल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक बलराम भार्गव यांनी म्हटले आहे.
डॉ. बलराम भार्गव यांनी देशातील कोरोनाच्या प्रभावाविषयी माहिती दिली.यावेळी त्यांनी छोट्या जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण एक टक्क्यांपेक्षा कमी आहे तर शहरी भागात हे प्रमाण फक्त एक टक्क्यांपेक्षा जास्त आहे. भारत खूप मोठा देश आहे आणि त्यादृष्टीने प्रभाव कमी आहे. भारतात समूह संसर्ग झालेला नाही. आम्हाला आढळले आहे की छोट्या जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण एक टक्क्यांपेक्षा कमी आहे, शहरी भागात तो एक टक्क्यांपेक्षा थोडा जास्त असल्याचे भार्गव यांनी म्हटले आहे.
देशभरात लॉकडाऊन करत आपण जी पावले उचलली त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यात आणि वेगाने त्याचा होणार फैलाव थांबवण्यात यश मिळाले आहे असे देखील त्यांनी म्हटल. टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रॅकिंग सोबत अलग ठेवण्याचे उपाय आणि देशातील सध्याच्या उपाययोजना चालू ठेवणे आवश्यक आहे. यामुळेच आपण कोरोनाचा संसर्ग वाढण्यावर अंकुश ठेवून आहोत.
आता आपण दररोज 1.51 लाख चाचण्या करत आहोत आणि दररोज 2 लाख चाचण्या घेण्याची क्षमता आपल्याकडे आहे. देशात 50 लाख चाचण्या आतापर्यंत पार केल्या आहेत. देशात कोरोना चाचण्यांसाठी राज्य सरकारांनी सरकारी आणि खासगी दोन्ही प्रयोगशाळेचा वापर करावा, असेही त्यांनी आवाहन देखील त्यांनी केले.