पुणे – ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे घरांचे, शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्तांना आपत्ती प्रतिसाद निधीमधून देण्यात येणारी मदत मर्यादित होती. यंदा मात्र शासनाने मदतीमध्ये वाढ केली आहे. पूर्णत: घर पडले असल्यास देण्यात येणाऱ्या मदतीमध्ये 55 हजार रुपयांची वाढ करण्यात आली असून आता नुकसानग्रस्तांना दीड लाख रुपयांची मदत मिळणार आहे. अंशत: पडझड झालेल्या घरांसाठी 15 रुपयांची तर पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर 50 हजार रुपयांची मदत नुकसानग्रस्तांना मिळणार आहे.
‘निसर्ग’ चक्रीवादळाचा तडाखा अनेक जिल्ह्यांना बसला आहे. या परिस्थितीमुळे सामान्य जनजीवन विस्कळीत होऊन मालमत्तेचेही नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या व्यक्तींना विविध बाबींच्या नुकसानीसाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन निधी व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन निधीमधून केंद्र शासनाने विहित केलेल्या दरानुसार शासनाने विशेष बाब म्हणून आर्थिक मदतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.