पुणे – मंत्रिमंडळातील कोणत्याही सदस्यांनी राज्याच्या प्रशासनाबाबत मुख्यमंत्र्यांकडे काही सूचना केल्या असतील तर त्यांनी त्यावर निर्णय घ्यावा, असे सांगत, कॉंग्रेसमध्ये महाविकास आघाडी सरकारबाबत कुठलीही नाराजी नसल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.
यावेळी चव्हाण यांनी केंद्रशासनाच्या आर्थिक धोरणांवर जोरदार टीका केली. देशातील अर्थव्यवस्था रुळावर आणायची असल्यास केंद्राने सर्व क्षेत्रातील कामगारांच्या खात्यात थेट पैसे जमा करावेत, अशी मागणी त्यांनी चव्हाण यांनी यावेळी केली. त्यामुळे जर देशाची आर्थिक स्थिती बिघडली आणि कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यास त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार असतील, असा इशाराच त्यांनी यावेळी दिला.
केंद्राने जाहीर केलेल्या 20 लाख कोटींच्या पॅकेज मध्ये प्रत्यक्षात केवळ 2 लाख कोटीच्या नागरिकांच्या प्रत्यक्ष हातात पडणार असून 18 लाख कोटी कर्जाच्या रूपात उपलब्ध होणार असल्याचे सांगत, त्यातून देशाची आर्थिक समस्या सुटणार नाहीत, असे सांगत पंतप्रधानांच्या अपयशावर चव्हाण यांनी टिका केली. आज, कॉंग्रेसच्या नेत्यांची मुख्यमंत्र्यासोबत झालेली बैठक प्रत्येक 15 दिवसांनी होणारी समन्वयाची असावी मंत्र्यांच्या बदलीची नाही, असे सांगत या कॉंग्रेस नेत्यांच्या नाराजीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न चव्हाण यांनी केला. शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी यावेळी उपस्थित होते.