मुंबई : अरबी समुद्रात नैऋत्य मोसमी वारे सक्रिय झाल्याने येत्या काही दिवसात मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रातही लवकरच मान्सूनचे आगमन होणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे. शिवाय आता कृषी क्षेत्रासाठीही मान्सूनकडून सकारात्मक संकेत मिळत आहेत.
भारतीय उपखंडात मान्सून सामान्य गतीने पुढे सरकत आहे. येत्या काही दिवसात मान्सून पुढे सरकण्यासोबतच ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्रात 10 ते 16 जून दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, कर्नाटक आणि केरळच्या समुद्रकिनारी दाखल झाल्यानंतर मान्सूनने मागील दोन दिवसात कर्नाटकचा अंतर्गत भाग, तामिळनाडूचा बहुतांश भाग आणि रायलसीम तसंच आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनारपट्टीच्या काही भागांमध्ये एंट्री केली आहे.
बंगालच्या खाडीत लवकरच एक निम्न दबावाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यात आहे. सध्या बंगालच्या खाडीचे मध्य-पूर्व आणि त्याजवळच असलेल्या बांगलादेश तसंच म्यानमारच्या किनारपट्टी भागांमध्ये चक्रीवादळाच्या वाऱ्याचे क्षेत्र निर्माण झाले आहे. वातावरणाची परिस्थिती आणि सागरी परिस्थितीमुळे असे संकेत मिळत आहेत की, लवकरच या क्षेत्राचं रुपांतर निम्न दबावच्या क्षेत्रात होईल. अशीच परिस्थिती राहिली तर देशाच्या अनेक भागांमध्ये पाऊस पडू शकतो.
बंगालच्या खाडीत निर्माण होणाऱ्या स्थितीमुळे मान्सून मोठी झेप घेण्याची शक्यता आहे. जेणेकरुन मान्सून पूर्वोत्तर भाग पार करुन पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि ओदिशामध्ये पोहोचेल. तसंच अरबी सागरात नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे येत्या काही दिवसात मान्सून कर्नाटक आणि रायलसीमाचा भाग पार करुन तेलंगणाला पोहोचेल. सोबतच मुंबईसह कोकण आणि आणि मध्य महाराष्ट्रातही लवरकर मान्सून वर्दी देईल.
पूर्वोत्तर भारतात मान्सूनचा वेग काहीसा धीमा आहे. परंतु 3 ते 4 दिवस उशीर हे सामान्यच समजले जाते. याचदरम्यान पूर्वोत्तर भारताच्या काही भागांसह कोकण, महाराष्ट्र, तेलंगणा तसंच आंध्र प्रदेशच्या उर्वरित भागांमध्ये मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थितीत निर्माण झाली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात देशात मान्सूनचा पाऊस सामान्यपेक्षा 71% अधिक पडला आहे. यात सर्वाधिक योगदान मध्य भारत आणि केरळचे आहे.