पिंपरी(प्रतिनिधी) – महावितरणच्या 112 वीज वाहिन्यांवर झाडे किंवा फांद्या पडल्याने शहरातील अनेक भागात बुधवारी वीज पुरवठा खंडित झाला होता. वादळाचा जोर कमी होताच महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहचत सायंकाळपर्यंत अनेक भागातील वीजपुरवठा पूर्ववत केला. परंतु काही भाग मात्र बारा तासांपेक्षा अधिक काळ अंधारातच होते. पिंपळे सौदागर, ताथवडे, वाकड आणि थेरगावच्या काही भागांमध्ये तब्बल बारा तासांहून अधिक काळ वीज पुरवठा खंडितच होता. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली. आज पहाटे तीन ते साडेतीनच्या सुमारास बहुतांश भागाचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आले. दरम्यान, आजही काही भागांमध्ये सकाळपासूनच वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू होते.
पिंपरी-चिंचवड शहरात बुधवारी झालेल्या वादळी पावसाने पिंपरी, चिंचवड व भोसरीमध्ये वीज यंत्रणेला मोठा तडाखा बसला. बहुतांश भागातील वीज पुरवठा बंद पडला. पिंपरी, चिंचवड, भोसरी, रावेत, आकुर्डी, मोशी, चऱ्होली, सांगवी, वाकड, बिजलीनगर, खराळवाडी, पिंपळेसौदागर आदी भागांतील 112 वीज वाहिन्यांवर झाडे किंवा फांद्या पडल्या. केबल किट जळाले, विजेचे खांब कोसळले. खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत सुरळीत करण्याचे काम महावितरणकडून रात्रभर प्रयत्न सुरू होते. आज पहाटे तीन ते साडेतीनच्या सुमारास शहरातील बहुतांश भागाचा वीजपुरवठा सुरळीत झाला होता.
पिंपळे सौदागर, ताथवडे, वाकड आणि थेरगावच्या काही भागात तब्बल बारा तासांहून आधिक काळ वीज पुरवठा खंडित होता. चिंचवड परिसरात नऊ तास वीजपुरवठा खंडित होता. पिंपरी कॅम्प, पिंपरीगाव, पिंपळे सौदागर आणि वाकडच्या काही भागातील वीजपुरवठा सहा तासानंतर सुरळीत करण्यात महावितरणला यश आले. पिंपळे सौदागर, ताथवडे आणि वाकडच्या काही भागामध्ये आज सकाळी देखील वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू होते.
महावितरणचे कार्यकारी अभियंता शिवाजी वायफळकर म्हणाले, शहरातील बहुतांश भागाचा वीज पुरवठा आज पहाटे तीन ते साडेतीन वाजेपर्यंत सुरळीत करण्यात यश आले. काही भागांचा वीजपुरवठा बुधवारीच सहा तासानंतर सुरळीत केला होता. तथापि, पिंपळे सौदागर, ताथवडे आणि वाकडच्या काही भागांमध्ये खंडित असलेला वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सकाळपासून सुरू करण्यात आले.
शहरात 45 ठिकाणी कोसळले वीजखांब
पिंपरी-चिंचवड परिसरात वादळी वाऱ्यासह बुधवारी आलेल्या पावसाने वीजयंत्रणेला मोठा तडाखा बसला. 45 ठिकाणी वीजखांब कोसळले. चार ठिकाणी रोहित्र जमीनदोस्त झाले. अनेक ठिकाणी वीजतारा तुटल्या. त्यामुळे 112 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. यामध्ये आज पहाटेपर्यंत अविश्रांत दुरुस्ती काम करुन बहुतांश भागातील वीजपुरवठा सुरु करण्यात आला. दुपारपर्यंत हिंजवडी, वाकडचा काही भाग, खराळवाडीमधील काही सोसायट्या, पिंपळे सौदागरचा काही भाग तसेच भोसरीमधील काही भागात वीजपुरवठा सुरु करण्यासाठी दुरुस्ती कामे सुरु होती. सायंकाळी किंवा रात्री उशिरापर्यंत या सर्व भागात वीजपुरवठा सुरू करण्यात येणार असल्याचे महावितरणचे जनसंपर्क अधिकारी निशिकांत राऊत यांनी कळविले आहे.