नवी दिल्ली: भारतात बुधवार सकाळपासून 24 तासांत नवे 9 हजार 304 करोनाबाधित आढळले. एकाच दिवसात एवढ्या प्रमाणात करोनाबाधित आढळण्याचा देशातील तो उच्चांक ठरला.
देशात संबंधित 24 तासांत 260 करोनाबाधित मृत्युमुखी पडले. त्यामुळे देशातील बळींची संख्या 6 हजार 200 च्या घरात पोहचली आहे. देशात सर्वांधिक करोनाबाधित आणि बळींची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. बाधित संख्येत तामीळनाडू दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्या राज्यात 26 हजारांहून अधिक करोनाबाधित आहेत.
दिल्लीतील करोनाबाधितांची संख्या 24 हजारांच्या घरात पोहचली आहे. तर गुजरातमध्ये 18 हजारांहून अधिक रूग्णांना करोनाचा संसर्ग झाला आहे. बळींच्या संख्येचा विचार करता महाराष्ट्रानंतर गुजरात दुसऱ्या स्थानी आहे.
गुजरातेत करोनाने 1100 हून अधिक बाधितांचा बळी घेतला आहे. देशातील 1 लाखहून अधिक बाधित याआधीच करोनामुक्त झाले आहेत. बऱ्या झालेल्या रूग्णांची संख्या सक्रिय बाधितांच्या जवळ जाऊन ठेपली आहे. ती बाब देशासाठी दिलासादायक मानली जात आहे.