रत्नागिरी/सिंधुदुर्ग: रत्नागिरी, सिधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण कोकणाला निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. दक्षिण रत्नागिरीतील गुहागर, दापोली आणि मंडणगड या तालुक्यात प्रचंड नुकसान झाले आहे. वेगवान वाऱ्यामुळे फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. तसेच अनेक घरांची छते उडून गेली आहेत. या वादळामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.
निसर्ग चक्रीवादळाचा प्रभाव काल (3 जून) संध्याकाळपर्यंत होता. चक्रीवादळाचे केंद्रबिंदू अलिबाग असल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, दापोली, गुहागर या तालुक्यांना मोठा फटका बसला. वेगवान वाऱ्यामुळे अनेक गावं अक्षरशः कोलमडून पडली आहेत. एकीकडे मुसळधार पाऊस आणि दुसरीकडे घरावरची कौले, पत्रे कागदासारखी उडून जात होती. हे चित्र मंडणगड, दापोली, गुहागर या तीन तालुक्यांमध्ये सर्वाधिक पाहायला मिळाले. विजेचे खांब कोसळल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे. मोबाइल टॉवर पडले आहेत. अनेक ठिकाणी घरांवर झाडे पडली आहेत.
जिल्हा प्रशासनाने तत्काळ पंचनामे करायला सुरुवात केली आहे. दापोली तालुक्यातील काजू, आंब्याच्या झाडांचे मोठे नुकसान झाले आहे. हर्णे बंदराजवळील नाडे गावात सुमारे 80 घरांचे या वादळात नुकसान झाले आहे. पाजपंढरीतील दोन जण वादळात जखमी झाले आहेत. आगरवायगणी येथील विरेंद्र येलंगे यांचा एक बैल तर आंजर्लेतील राजेश बोरकर यांच्या गायीचा मृत्यू झाला आहे. आंजर्लेतील मंगेश महाडिक यांच्या सुमारे 48 कोंबड्या मृत पावल्या आहेत.
दापोली तालुक्यातील अनेक भागात 48 तासांपासून वीज गायब आहे. तसेच वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी पुढील दोन ते तीन दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, यावेळी 2009 साली आलेल्या फयान वादळापेक्षाही जास्त नुकसान झाले आहे.
मुंबई-ठाण्यात मुसळधार, रत्नागिरीत धुवांधार
निसर्ग चक्रीवादळ ओसरले असले, तरी राज्यात सर्वदूर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई शहर-उपनगरांसह ठाणे, कल्याण, भिवंडी, वसई-विरार भागात जोरदार पाऊस बरसत आहे. मुंबईवर सकाळपासूनच काळे ढग दिसत होते. मुंबईतील दादर, वरळी, वांद्रे, अंधेरी, बोरीवलीसह बहुतांश भागात सकाळपासून पावसाने हजेरी लावली. ठाणे शहरात पावसाचा जोर पाहायला मिळाला. मिरा भाईंदर, वसई विरारमध्ये वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाउस झाला. कल्याणमध्ये जोरदार पाऊस कोसळत असून अंबरनाथ बदलापुरातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.