पिंपरी (प्रतिनिधी) – प्रश्न विचारत राहणे हाच आज आपल्या जवळ असलेले ज्ञान अद्यावत करण्याचा सोपा मार्ग आहे, असे मत सिंगापूरच्या नॅशनल युनिव्हर्सिटीचे प्राध्यापम डॉ. बिमलेश वाधवा यांनी व्यक्त केले.
ताथवडे येथील राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली होती. त्या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी वाधवा यांनी ऑनलाइन संवाद साधला. “ऍडव्हान्स ट्रेंडस इन कॉम्प्युटर सायन्स ऍण्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी’ या विषयावर ही परिषद घेण्यात आली. इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर आणि कम्युनिकेशन या क्षेत्रातील संशोधक व पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी या परिषदेत ऑनलाइन सहभाग घेतला. त्याशिवाय, जेएसपीएम संस्थेचे संचालक डॉ. रवी जोशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. जैन, डॉ. डी. एस. बोरमाने, डॉ. पी. पी. विटकर, अविनाश देवस्थळी डॉ. सीमा केदार आदींनी देखील परिषदेत सहभाग घेतला.
ऑनलाइन परिषदेमध्ये देशातील आणि विदेशातील विविध विद्यापीठातील तसेच उद्योगामधील पीएचडी करणारे संशोधक, पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी यांनी 75 पेक्षा आधिक संशोधनपर प्रबंध सादर केले.