महाबळेश्वर -करोनाचा प्रादुर्भाव देशात व राज्यात वाढत असल्याने त्याची धास्ती कायम आहे. महाबळेश्वर शहरही त्याला अपवाद ठरलेले नाही. प्रशासनाच्या अथक परिश्रमामुळे शहरात अजूनही करोनाचा शिरकाव झाला नसला तरी धास्तावलेल्या शहरवासीयांनी एसटी बससेवेकडे पाठ फिरवली आहे. एसटी महामंडळाने जिल्ह्यांतर्गत सेवा सुरू केली; परंतु सोमवारी महाबळेश्वर बसस्थानकात तीन तास बस उभी करूनसुद्धा एकही प्रवासी मिळाला नाही.
गेल्या तीन महिन्यांमध्ये महाबळेश्वरमध्ये करोना विषाणूचा शिरकाव झालेला नाही. एकही बाधित रुग्ण आढळला नसला तरी या संकटाची दहशत कायम आहे. याचा अनुभव महाबळेश्वर एसटी बसस्थानकात येत आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यांतर्गत एसटी बससेवा सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार आगारातून तूर्तास फक्त वाई व साताऱ्यासाठी बससेवा सुरू करण्यात आली आहे.
बसस्थानकात बसेस फलाटांवर उभ्या राहतात; परंतु तीन तीन तास बस उभी करूनही प्रवासी मिळत नाहीत. त्यामुळे बसस्थानकावर शुकशुकाट असतो. बसस्थानकावर सोमवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास साताऱ्याला जाणारी बस फलाटावर लागली तरी 11 वाजेपर्यंत केवळ दोनच प्रवासी गाडीत होते. त्याचबरोबर एसटी चालक-वाहकही दडपणाखाली असल्याचे जाणवते.