चौकशीदरम्यान सट्टेबाज संजीव चावलाकडून झाले धक्कादायक खुलासे
मुंबई – लंडनमधून भारतात आणण्यात आलेला सट्टेबाज संजीव चावला याची दिल्ली पोलिसांकडून सखोल चौकशी करण्यात येत असून त्यात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. त्यात 2000 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघ मायदेशात मालिका खेळत होता त्यातील सामने फिक्स होते, असा खुलासा त्याने केल्याचे समोर आले आहे, अशी माहिती त्या काळी भारतीय क्रिकेट नियामक मंडळात पदाधिकारी असलेल्या एका व्यक्तीने दिली आहे.
1999-2000 साली मॅच फिक्सिंगचे रॅकेट उघडकीस आले होते. या काळात चावला हा दाऊद इब्राहिमसाठी सामने फिक्स करायचा. लंडनमध्ये बसून दोन्ही संघातील काही खेळाडूंशी त्याने सातत्याने संपर्क साधला होता. त्यात दक्षिण आफ्रिकेचा तत्कालीन कर्णधार हॅन्सी क्रोनिए प्रमुख सूत्रधार होता. त्याच्या जबानीतून त्यावेळी अनेक खेळाडूंवर आरोप ठेवण्यात आले होते व त्यांच्यावर कठोर कारवाई देखील करण्यात आली होती.
या प्रकरणाच्या निकालानंतर क्रोनिए एका विमान अपघातात मृत्यू पावला. त्यांच्या संघातील निकी बोए व हर्षल गिब्ज यांच्यावर बंदीची कारवाई करण्यात आली होती. भारतीय संघाचा तत्कालीन कर्णधार महंमद अझरुद्दीन व अजय शर्मा यांच्यावर तहहयात बंदी लावण्यात आली होती. त्यांनाही दोन वर्षांपूर्वी या बंदीतून क्लीन चिट दिली गेली. अजय जडेजाने पाच वर्षांची बंदी भोगून देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी काही खेळाडूंचे फोन टॅप केले होते त्यातून हे प्रकरण बाहेर आले होते. भारत व इंग्लंड यांच्यात प्रत्यार्पण करार त्यावेळी झालेला नसल्याने चावला इंग्लंडला पळून गेला होता. प्रत्यार्पण करा झाल्यानंतर त्याला आता 19 वर्षांनी अटक करून भारतात आणण्यात आले व त्याच्या चौकशीतून हा खुलासा बाहेर आला आहे. आता पुढील चौकशीतून किती प्रकरणे बाहेर येतील त्यावर काही खेळाडूंची कर्तबगारी जगासमोर येइल.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या मालिकेतील मुंबईत झालेला कसोटी सामना तसेच कोचीला झालेला एकदिवसीय सामना फिक्स करण्यात आला होता. आता याबाबत येत्या काळात आणखीही काही सत्य बाहेर येण्याची शक्यता आहे.
चित्रपटाप्रमाणे प्रत्येक सामना फिक्स असतो…
मॅचफिक्सिंग थांबलेले नाही तर आजही हा सर्व प्रकार त्याच जोशात सुरू आहे. त्यात अंडरवर्ल्ड, सेलिब्रिटी तसेच विविध वर्गातील उच्चभ्रू व्यक्ती आजही यात सहभागी आहेत. एखाद्या चित्रपट जसा आधी ठरल्याप्रमाणे किंवा दिग्दर्शित केलेला असतो तसाच क्रिकेटचा प्रत्येक सामना ठरल्यानुसारच खेळवला जातो, असा धक्कादायक खुलासा संजीव चावला याने केला आहे. चावला व त्याचे अन्य तीन साथीदार सध्या जामिनावर बाहेर आले असले तरीही दिल्ली पोलिसांनी त्यांना अन्य काही आरोपाखाली पुन्हा अटक करण्यासाठी हालचाल सुरु केली आहे.