नगर, दि.31 (प्रतिनिधी) -शहरातील विकास कामासाठी विविध योजनांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र, गेल्या 2 महिन्यांपासून सुरु असलेल्या लॉकडाऊन मुळे विकासकामे थांबली होती. महापालिकेच्या माध्यमातूनही शहरात होणऱ्या कामांना आता गती मिळेल. महापौर-उपमहापौर शहरातील समस्या सोडवण्यासाठी कायमच प्रयत्नशील असतात. नागरिकांनी करोनाच्या संकटात प्रशासन व लोकप्रतिनिधीना सहकार्य करावे. आपापल्या भागात होणऱ्या विकासकामांचा दर्जा नागरिकांनी तपासावा, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.
उपमहापौर मालन ढोणे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या प्रभाग 9 मधील सर्जेपुरा भागातील व्हिल्सेनपुरा मध्ये भूमिगत ड्रेनेज लाईन व रस्ता कॉंक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे, भाजप शहराध्यक्ष महेंद्र गंधे, शहर अभियंता सुरेश इथापे, नगरसेवक समद खान, भा कुरेशी, माजी नगरसेवक धनंजय जाधव, आरिफ शेख, अजय चितळे, अजय ढोणे, संजय ढोणे, उबेद शेख, अभियंता श्रीकांत निंबाळकर उपस्थित होते.
महापौर म्हणाले, नगर शहराचा 530 वा स्थापनादिन कालच साजरा झाला आहे. तब्बल 500 हून अधिक वर्षाचा एतेहासिक व वैभवशाली वारसा लाभलेले आपले नगर आता महानगर झाले आहे. मनपाच्या माध्यमातून कामे करण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील विविध भाग हळूहळू समस्यामुक्त होत आहे. प्रास्ताविकात उपहापौर ढोणे म्हणाल्या, प्रभाग 9 मध्ये अनेक वर्षांपासून समस्या प्रलंबित होत्या.