आयसीसीचा वेळकाढूपणा आयपीएलसाठी का?
दुबई – जवळपास चार तास रंगलेल्या बैठकीतदेखील कोणताही ठाम निर्णय न घेता टी-20 विश्वकरंडकाबाबत आयसीसीने केवळ टोलवाटोलवी केली असून अंतिम निर्णय 10 जूनपर्यंत घेतला जाईल, असेही आयसीसीने स्पष्ट केले आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वकरंडक स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. मात्र, या स्पर्धेबाबत करोनाचा धोका वाढल्यापासूनच अनिश्चिततेचे ढग जमा झाले आहेत. ही स्पर्धा होणार की त्या कालावधीत मिळणारी विंडो बीसीसीआयला पडद्यामागून बहाल करत आयपीएल घेण्यासाठी उपलब्ध करून देणार, असा प्रश्न विचारला जात होता. ही स्पर्धा कोणत्याही परिस्थितीत घेतली जाईल, असे काही दिवसांपूर्वी सांगत असलेल्या आयसीसीने आजच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत कोणतीही ठाम भूमिका घेतली नसून याबाबतचा निर्णय 10 जूनपर्यंत जाहीर केला जाईल, असेही आयसीसीने स्पष्ट केले आहे.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने भारताविरुद्धच्या मालिकेचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला त्यात टी-20 मालिकेतील एक लढत 17 ऑक्टोबरला होणार असल्याचे जाहीर झाले तेव्हाच विश्वकरंडकाबाबत संभ्रम निर्माण झाला होता.