सर्वाधिक मृत्यू होणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर
राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाच्या नोंदीतून उघड झाली माहिती
– गायत्री वाजपेयी
पुणे – एकीकडे देशात वाघांची संख्या वाढत असल्याचे सांगितले जात असतानाच, दुसरीकडे मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. गेल्या तीन वर्षांपासून मृत वाघांच्या संख्येने शंभरी ओलांडली असून, वाघांचे सर्वाधिक मृत्यू होणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाच्या (एनटीसीए) नोंदीतून समोर आले आहे.
“एनटीसीए’तर्फे संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर 2012 ते मार्च 2020 या आठ वर्षांतील वाघांच्या मृत्यूंची राज्यनिहाय आकडेवारी जाहीर केली आहे. या नोंदीनुसार, देशभरात गेल्या आठ वर्षांत 750 वाघांचा मृत्यू झाला असून, सर्वाधिक 173 मृत्यू हे मध्य प्रदेशात झाले आहेत. तर, महाराष्ट्रात 125 वाघांच्या मृत्यूची नोंद आहे. वाघांचे सर्वाधिक मृत्यू होणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर सर्वात कमी मृत्यूदर हा गुजरात, हरियाणा, अरुणाचल प्रदेश (प्रत्येकी एक) आणि नागालॅन्ड (दोन) या राज्यांमध्ये आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यू हे नैसर्गिक कारणामुळे झाले आहेत.
मात्र, विषप्रयोगामुळे मृत्यू झालेल्या वाघांची संख्या देखील लक्षणीय आहे. गेल्या आठ वर्षांत मरण पावलेल्या 750 वाघांमध्ये नैसर्गिक कारणामुळे मृत झालेल्या वाघांची संख्या 369 इतकी आहे, तर विषप्रयोगाने मारलेल्या वाघांची संख्या 168 आहे. त्यापाठोपाठ वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत वाघांची संख्या 101 इतकी आहे, तर शिकार, अपघात यासारख्या कारणांमुळे मृत्यू झालेल्या वाघांची संख्या 42 इतकी आहे. तर उर्वरित 70 वाघांच्या मृत्यूचे खरे कारण अद्यापही प्राधिकरणाला माहिती नसल्याचे समोर आले आहे. 2016 नंतर वाघांच्या मृत्यूची संख्या दरवर्षी शंभरी पार करत आहे. वाघांच्या रक्षणासाठी देशात सातत्याने विविध प्रयत्न होत आहे. मात्र, तरीही ही संख्या वाढत आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाघांचे ट्रॅकिंग
व्याघ्रसुरक्षेसाठी पारंपरिक उपाययोजनांबरोबरच अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावरही भर दिला जात असून, विविध आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाघांचे ट्रॅकिंग करणे, वाघ्र प्रकल्प असलेल्या क्षेत्रात सुरक्षेचे उपाय राबविणे, जनजागृती, संशोधन असे अनेक प्रयत्न केले जात आहे. आगामी काळात ही संख्या निश्चितपणे कमी होईल, असा विश्वासदेखील प्राधिकरणाकडून व्यक्त केला जात आहे.