लाखणगाव -आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील काठापूर बुद्रुक येथील घोडनदीवर असलेल्या बंधाऱ्यावरून मोठ्या प्रमाणावर जड वाहनांची वाहतूक होत आहे. तर बंधाऱ्यावरील रस्त्यावर खड्डे पडले असून संरक्षण कठड्यांची दुरवस्था झाल्याने बंधारा धोकादायक बनला असून जड वाहनांवर कारवाई करण्यासाठी ग्रामपंचायत आणि जलसंपदा विभागाने लक्ष घालावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
काठापूर बुद्रुक आणि काठापूर खुर्द या दोन गावांना जोडणारा तसेच घोडनदीवरील पाणी अडवण्यासाठी काठापूर येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा 30 वर्षांपूर्वी बांधण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्वांत लांब बंधारा असून बंधाऱ्यांचा फुगवटा पारगाव गावापर्यंत पाठीमागे चार किलोमीटरपर्यंत असल्याने काठापूर, लाखणगाव, पोंदेवाडी, काठापूर खुर्द, शिंगवे, वळती, पारगाव, जारकरवाडी येथील शेतकऱ्यांनी जलसिंचन योजना राबवली आहे.
तर सध्या बंधाऱ्याला धोका निर्माण झाला आहे. तरी ग्रामपंचायतींनी बंधाऱ्यांच्या दोन्ही बाजूला लोखंडी अँगल लावून कमी उंचीचे प्रवेशद्वार बनवले तर मोठी वाहने बंधाऱ्यावरून जाणार नाहीत. पाणी अडवण्यासाठी आणि स्थानिक नागरिकांना ये-जा करण्यासाठी बंधाऱ्यावरील रस्त्याचा उपयोग करणे गरजेचे असताना. मोठ्या प्रमाणावर जड वाहतूक केली जात असल्याने बंधारा धोकादायक झाल आहे.