मंचर – लॉकडाऊनमध्ये हरविलेल्या आजींना 8 दिवसांनंतर सुखरुप घरी पोहाचविण्यास मल्हार प्रतिष्ठान मंचर व हुतात्मा राजगुरू सोशल फाऊंडेशच्या कार्यकर्त्यांना यश आले. मंचर एसटी बसस्थानकात काही दिवसांपासून बेवारसपणे एक आजी बसून होत्या. त्यांना राजगुरुनगरमधून कोणाच्या तरी सांगण्यावरूनच मंचरला आणले होते.
आजी तिच्याबद्दल काही माहिती व्यवस्थित सांगत नव्हती. राजू चौधरी यांनी आजींना मंचरला सोडवल्याविषयीची माहिती हुतात्मा राजगुरू सोशल फाऊंडेशचे सचिव कैलास दुधाळे यांनी फेसबुकवर आणि व्हॉट्सऍपवर पाठवली होती.
ही माहिती वाचून हुतात्मा राजगुरू सोशल फाऊंडेशनच्या संचालिका डॉ. निलम गायकवाड यांनी त्या आजी रानमळ्याच्या रुक्मिणी विठ्ठल भुजबळ असल्याबाबतची खात्रीशीर माहिती दिली. तात्काळ त्या आजींना कल्पेश बाणखेले यांच्या मल्हार फाऊंडेशनच्या वतीने चार चाकी गाडीतून मंचरवरून कडूस येथे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणण्यात आले.
आजीची आरोग्य तपासणी करून त्या ठिकाणी आजीच्या घरच्यांच्या म्हणजे त्यांचा मुलगा रामदास विठ्ठल भुजबळ यांना बोलावून त्यांच्या ताब्यात देण्यात आले. रामदास भुजबळ यांनी मल्हार प्रतिष्ठान मंचर व हुतात्मा राजगुरू सोशल फाऊंडेशनचे मनापासून आभार मानले.