जामखेड -शहरात सध्या 15 दिवसांनी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. अशातच लॉकडाऊनमुळे सर्वसामान्याचे अर्थिक गणित बिघडले आहे. त्यामुळे नीलेशभाऊ मित्रमंडळ व महासंग्राम युवा मंचाने शहरात दहा टॅंकरद्वारे दररोज चाळीस खेपा पाणी देण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे टंचाईच्या काळात नागरिकांची पाण्याची सोय झाली आहे.
जामखेड शहराला व आठ वाड्या-वस्त्यांसाठी भुतवडा व काझेवाडी तलावांतून पाणीपुरवठा केला जातो. परंतु काझेवाडी व भुतवडा तलाव सद्यस्थितीत कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे नगरपरिषदेने सहा दिवसांआड होणारा पाणीपुरवठा 15 दिवसांआड केला. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात टॅंकर सुरू करण्यात आले होते. मात्र सध्या विकतच्या पाण्याशिवाय पर्याय राहिला नाही.नीलेश गायवळ यांनी तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची परिस्थिती पाहून सुरवातीला खर्डा व जवळा जिल्हा परिषद गटांत मागेल त्याला टॅंकरने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली.
जामखेड शहरात 15 दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याचे त्यांना समजतात त्यांनी नगरसेवक महेश निमोणकर यांच्याशी संपर्क करून नीलेशभाऊ मित्रमंडळ व महासंग्राम युवा मंचातर्फे रविवारी (दि.17) शहरासाठी दहा टॅंकर सुरू केले. तहसीलदार विशाल नाईकवाडे, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, नगरसेवक बिभीषण धनवडे, संजय कार्ले यांच्या उपस्थितीत टॅंकरचे पूजन करण्यात आले. यावेळी संजय कार्ले यांनी सर्व टॅंकर चालकांना मास्कचे वाटप केले. तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी या उपक्रमाचे स्वागत केले. शहरात 10 टॅंकरने मोफत पाणीपुरवठा सुरू झाल्यामुळे नागरिकांचा खर्च वाचणार आहे.