नगर -नगर शहराच्या मध्यवर्ती भागात करोनाबाधित आढळ्याने तो परिसर हॉटस्पॉट करण्यात आले आहे. आजुबाजुचा दोन किलोमीटरचा परिसर बफर झोन म्हणून घोषित करण्यात आले. तथापि, त्यातून अत्यावश्यक सेवाही ठप्प झाल्या आहेत. त्यामुळे या भागातील बफर झोनच्या अंतराविषयी नागरीकांची नाराजी असल्याची भूमिका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे मांडली.
करोनाचे वाढते प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याची सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी राज्यातील सर्वच जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करुन त्यांची मते जाणून घेतली. विधाते यांनी शहराचे विविध मुद्दे पाटील त्यांच्यासमोर मांडले.
बफर झोनमुळे शहरातील अनेक व्यवसाय व दुकाने बंद करण्यात आले आहे. आधीच नगर शहर हे छोटे आहे. त्यात 2 किलोमीटरचे बफर झोनच्या अंतराची मर्यादा मोठी आहे. त्यामुळे निम्मे नगर शहर बंद अवस्थेत आहे. जो बफर झोन आहे. त्या ठिकाणी दाळमंडई व किराणा व्यापारी असल्याने ही जीवनावश्यक सेवा देखील बंद झाली आहे.
त्यातून नागरिकांची गैरसोय वाढली आहे. बफर झोनची मर्यादा लहान शहरांसाठी कमी करण्यासंदर्भात निर्णय व्हावेत, अशी भूमिका विधाते यांनी प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या समोर मांडली. लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवहार ठप्प आहेत. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अर्थचक्र पुर्वपदावर आनण्यासाठी चौथ्या लॉकडाऊन काळात व्यावसायिक, व्यापारी व उद्योजकांना अजूनही सवलती देऊन त्यांचा विचार करण्याची गरज आहे. नगर शहरातील महापालिका हद्दीतील विकासकामे मार्गी लावण्यासाठी आमदार संग्राम जगताप प्रयत्नशील आहेत. तथापि, प्रशासकीय पातळीवर त्याबाबत आयुक्तांना सुचना करणे, एमआयडीसी मधील 33 टक्के कामगार सेवेत हजर आहेत. ते वापरत असलेल्या खासगी गाड्यांची अडणूक होऊ नये. करोनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची निर्णय घेताना पालकमंत्री, आमदार व जिल्हाधिकारी यांनी संयुक्तपणे चर्चा व्हावी, आदी मुद्यांवरही विधाते यांनी मते मांडली.
भाजी व फळबाजार हलविण्यास विरोध…!
नगर शहरातील मार्केटयार्ड येथील भाजीबाजार केडगावजवळील उपबाजार येथे हलविण्याचा प्रस्ताव आहे. तथापि, त्यास आमदार संग्राम जगताप यांनी विरोध दर्शविलेला आहे. त्यामुळे भाजीपालाची वाहतूक खर्च वाढून भाजीपाला देखील महाग होईल, यात शंका नाही.