नगर -केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊन अंशत: शिथिल केल्याने परराज्यात तसेच परजिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांचे लोंढे नगरमध्ये दाखल होत आहेत. त्यातही मुंबई किंवा पुण्यातून येणाऱ्या आगंतुकांची संख्या जास्त आहे. या खास आगंतुकांमुळे नगरकरांच्या उरात धडकी भरली आहे. या अगंतुकांच्या तक्रारी स्थानिकांनी पोलीस ठाणे, प्रभाग सुरक्षा समितीकडे केल्या आहेत.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना म्हणून महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून गावागावांत येणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी सुरक्षा समित्या स्थापन केल्या आहेत. पुणे, मुंबई, औरंगाबाद तसेच इतर जिल्ह्यांतून, परराज्यांतून येणाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना संबंधित ठिकाणी क्वारंटाईन करण्यात येत आहे. या येणाऱ्या आगंतुकांमुळे इतरांना करोनाची बाधा होवू नये, यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. मात्र, काही महाभाग पोलीस व प्रशासनाची नजर चुकवून शहरातील गल्लोगल्ली दाखल होत आहेत.
नगर जिल्ह्यातील अनेक तरुण पुणे, औरंगाबाद, मुंबई येथे कामानिमित्त वास्तव्यास होते. मात्र, या तिन्ही शहरांत करोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे तेथे वास्तव्यास असलेले असंख्य नागरिक जिल्हात प्रवेश करत आहेत. त्यामुळे आता सीमेवरील गावकऱ्यांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. कारण, करोना आता नगर जिल्ह्यात पाय पसरू लागला आहे. इतर शहरांच्या मानाने संथ गतीने का होईना नगर जिल्ह्यात करोनाने साठी पार केली आहे. दोन्हीकडूनही छुप्या मार्गाने नागरिक अतिक्रमण करत आहेत. त्यामुळे बाहेरून आलेल्या नागरिकांचा नगरकरांना वानवळा नको, यासाठी नागरिकच स्वतःहून बाहेरून आलेल्यांच्या तक्रारी प्रशासनाकडे करत आहेत. नगर शहारात आता मोठ्या प्रमाणात बाहेर गावाहून नागरिकांचे लोंढे येत आहेत. त्यामुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. ही भीती कमी करण्यासाठी महापालिका प्रशासनाच्याच पुढाकाराने सुरक्षा समितीला निर्णय घेण्याचे विशेष अधिकार द्यावेत, अशी स्थापन झालेल्या सुरक्षा समित्यांकडून होत आहे.
“त्यांना’ लागण होण्याची अन् यांना वानवळ्याची भीती..!
बाहेर गावाहून येणाऱ्या नागरिकांना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात त्यांनी दाखल करण्याचे आदेश आहेत. तथापि, तेथे विशेष दखल घेत नाहीत, अशी बाहेर गावाहून येणाऱ्यांची तक्रार आहे. त्यात तेथे जास्त वेळ गेल्यास तेथून संक्रमित होण्याची त्यांना भीत आहे. मात्र, तपासणी न करता शेजारी आल्यास त्यांच्याकडून वानवळा मिळू शकतो, अशी स्थानिकांना भीती आहे. अशा दुहेरी कात्रित समाजव्यवस्था सापडली आहे.