पुणे – माणसाला जगण्यासाठी जसा ऑक्सिजन महत्त्वाचा आहे. तसाच देशाच्या अर्थकारणाला आकार देण्यासाठी सनदी लेखापाल (सीए) गरजेचा असतो. देशाच्या आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या “सीएं’ना देशासह परदेशातही कामाच्या मोठ्या संधी आहेत. त्यामुळे बारावीनंतर कोणीही सीए होऊ शकतो आणि आपल्या करिअरला योग्य वळण देऊ शकतो, असे प्रतिपादन दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंटस् ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) कौन्सिलचे सदस्य जय छायरा यांनी केले.
दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कॉमर्स व सीए क्षेत्रातील संधी या विषयावर आयसीएआय’च्या पुणे शाखेतर्फे वेस्टर्न इंडिया चार्टर्ड अकाउंटंटस् स्टुडंट्स असोसिएशन (विकासा) आणि “आयसीएआय’ अभ्यास मंडळाच्या सहकार्याने यू-ट्युबवरून लाईव्ह वेबिनारद्वारे मोफत करिअर मार्गदर्शन सत्र आयोजिले होते. विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील अनेक शंकाचे निरसन करण्यासह सीएची भूमिका, सीएचे महत्त्व, सीए नंतर विविध क्षेत्रातील संधी, सीए होण्यासाठीची तयारी कशी करावी, याबाबत माहिती यावेळी देण्यात आली.
“आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य चंद्रशेखर चितळे, “डब्ल्यूआयआरसी’ खजिनदार आनंद जाखोटीया, प्रसन्नकुमार, सीए के. डी. गारगोटे, एम. एस. जाधव, पुणे शाखेचे चेअरमन सीए अभिषेक धामणे, उपाध्यक्ष सीए समीर लड्डा, सचिव व खजिनदार काशीनाथ पठारे आदींनी यात मार्गदर्शन केले.