मुंबई – भारताच्या ज्या खेळाडूंना आयपीएलसारख्या परदेशात होत असलेल्या स्पर्धांमध्ये खेळण्याची परवानगी मिळावी अशी मागणी सुरेश रैना व इरफान पठाण यांनी भारतीय क्रिकेट नियामक मडळाकडे (बीसीसीआय) केली होती. या मागणीवर मंडळाने मत व्यक्त केले आहे. खेळाडूंना निवृत्तीनंतर अशा स्पर्धा खेळायच्या असतील तर आमची हरकत नाही. मात्र, ज्या खेळाडूंना भारतीय संघात पुनरागमन करण्याची संधी आहे त्यांचे नुकसान होऊ नये असा विचार करून ही परवानगी आजवर दिली गेली नाही, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.
भारतीय संघाकडून खेळलेले अनेक खेळाडू देशात आहेत. त्यांनी आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केली तर अजूनही ते भारतीय संघात स्थान मिळवू शकतात. जर अशा खेळाडूंना निवृत्ती घ्या असे दडपण देऊन मग परदेशातील स्पर्धांमध्ये खेळण्याची परवानगी देण्यात खेळाडूंचेच नुकसान आहे. उलट आपले काही वेगळेपण सिद्ध व्हावे हा मंडळाचा दृष्टिकोन आहे, असेही मंडळाने स्पष्ट केले आहे.
जे खेळाडू केवळ आयपीएल किंवा देशांतर्गत क्रिकेट खेळतात अशा खेळाडूंना देखील भविष्यात भारतीय संघात स्थान मिळू शकते. त्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी. कोणत्याही खेळाडूला परदेशातील लीगमध्ये खेळायचे असेल तर त्यांनी निवृत्ती घ्यावी व मगच त्यांना परवानगी दिली जाइल. मात्र, केवळ परदेशातील लीगमध्ये खेळून केवळ आर्थिक लाभ समोर ठेवून आपली कारकीर्द वेळेपूर्वी धोक्यात आणणे योग्य नाही, असेही मंडळाने स्पष्ट केले आहे.
गोनीची बीसीसीआयवर टीका…
आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या मनप्रीत गोनी यानेही बीसीसीआयच्या धोरणांवर टीका केली आहे. ज्या खेळाडूंना भारतीय संघात स्थानच मिळत नाही त्यांना परदेशातील लीगमध्ये खेळण्यासाठी परवानगी नाकारली जाते हे खेळाडूंच्या स्थैर्यासाठी नुकसानकारक आहे. केवळ देशांतर्गत स्पर्धा तसेच रणजी स्पर्धा खेळून खेळाडूंना आपला चरितार्थ चालवता येत नाही. जर भारतीय संघात निवड करताना काही खेळाडूंचा विचारही केला जात नाही अशा खेळाडूंबाबत तरी नियम बदलले गेले पाहिजेत, असेही गोनीने स्पष्ट केले आहे.