पुणे – राज्यात पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीसाठी सव्वा वर्षापासून प्रक्रिया सुरू आहे. शिक्षक भरतीसाठी पूर्वीच सर्व जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी शाळांमधील शिक्षक भरतीचा टप्पा पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे शिक्षक भरतीसाठी शासनाकडून विशेष परवानगी मिळवण्यासाठी शिक्षण विभागाने धडपड सुरू केली आहे. यासाठी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्यामार्फत राज्य शासनाकडे दोन दिवसांत प्रस्तावही पाठविण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळावे यासाठी शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याचा निर्णय राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने यापूर्वीच घेतला होता. नवीन व जुन्या शासनाने विविध विभागांच्या मेगा भरतीच्या अनेकदा घोषणा ही केल्या. मात्र, त्याची पूर्तता होऊ शकली नाही. हे उमेदवारांबाबत अन्यायकारक आहे.
शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शकपणे व्हावी यासाठी पवित्र पोर्टलही कार्यान्वित केले होते. या भरती प्रक्रियेत सुरुवातीपासून कोणत्या ना कोणत्या स्वरुपाचे अडथळे येतच आहे. आता गेल्या महिन्यापासून करोना विषाणूचा वाढलेला प्रादुर्भाव व त्यामुळे जाहीर केलेला लॉकडाऊन हा शिक्षक भरतीच्या प्रक्रियेत मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
पवित्र पोर्टलद्वारे उर्वरित शिक्षक भरती शेवटच्या टप्प्यात आली आहे. “आरटीई’च्या कायद्यानुसार विद्यार्थ्यांच्या पटसंख्यानुसार शाळांमध्ये शिक्षकांची भरती करणे आवश्यक आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. या भरतीतील जुनीच सर्व कामे पूर्ण करावयाची आहेत. त्यामुळे या भरती प्रक्रियेस परवानगी मिळण्याची गरज आहे. यासाठी शासनस्तरावर प्रस्तावातून सविस्तरपणे बाजू मांडण्यात येणार आहे. शासनाने शिक्षक भरतीसाठी सकारात्मकता दर्शविणे अपेक्षित आहे.
– विशाल सोळंकी, शिक्षण आयुक्त