विघ्नहर्त्याच्या कृपादृष्टीकडे आस
लॉकडाऊनमुळे फटका; भविष्याचीही चिंता
पुणे – लॉकडाऊनमुळे अनेक व्यावसायिकांना फटका बसला आहे. पर्यायाने व्यावसायिकांचे लक्ष आता आगामी काळातील सण आणि प्रामुख्याने गणेशोत्सवाकडे आहे. कुंभार वर्गदेखील अपवाद नाही. करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, त्यांना लॉकडाऊननंतरच्या “चक्रा’ची चिंता सतावत आहे. यामुळे त्यांच्याकडून विघ्नहर्त्याने सावट दूर करावे, अशी प्रार्थना करण्यात येत आहे.
लॉकडाऊनमुळे बहुतांश व्यवहार ठप्प आहेत. याचा फटका आगामी काळात बसणार असल्याची शक्यता अर्थतज्ञ व्यक्त करत आहेत. त्यामुळे व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
यंदा मूर्तीकारांसमोर करोनाचे संकट उभे राहिले आहे. सध्या वाहतुकीवर निर्बंध असल्याने गणपतीच्या मूर्तींसाठी आवश्यक असणारा कच्चा माल उपलब्ध होण्यास अडचणी येत आहेत. प्रामुख्याने पुणे, मुंबई, कोल्हापूर, पेण आदी ठिकाणांहून राज्याच्या विविध भागांत माती, रंग, साचे आदी साहित्य पोहोचवण्यात येते.
जानेवारी ते मे हा कालावधी कुंभारांसाठी महत्त्वाचा असतो. सुरुवातीच्या काळात माठ आणि त्यानंतर गणेश मूर्ती तयार करण्यासाठी लगबग सुरू होते. मेच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मूर्ती तयार होऊन, त्या वाळणे आवश्यक असते. पावसाळ्यात मूर्ती रंगवण्यात येतात. मात्र, यंदा उन्हाळ्यात मूर्तीच्या निर्मितीसाठी आवश्यक असणारे साहित्यच अनेक ठिकाणी न पोहोचल्याने धास्ती आहे. अनेकांकडे साचे (मोल्ड) असूनही साहित्य नाही, अशी स्थिती असल्याचे मूर्तीकार सांगतात. मागील वर्षीदेखील मूर्तीकारांना फटका बसला होता. अधिक पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी मूर्ती वाहून गेल्या होत्या. तर काहींच्या अंतिम टप्प्यात आलेल्या मूर्ती भिजल्याने नुकसान झाले होते.
माठ विक्रीचा सीझन हुकला
यंदा सामन्यांचा फ्रीज असणाऱ्या माठांची विक्री झाली नसल्याने कारागीर आणि विक्रेत्यांचे नुकसान झाले आहे. पावसाळ्यामध्ये तयार माठ व्यवस्थित ठेवावे लागतात. अपुऱ्या जागेमुळे शिल्लक किमान शेकडो माठ ठेवायचे कसे असा प्रश्न आहे. सीझनमध्ये माठांची विक्री न झाल्याने हजारो रुपयांचे भांडवल अडकल्याचे विक्रेते सांगतात.
एप्रिल-मेपर्यंत मूर्तीकारांकडे किमान 500 कोऱ्या मूर्ती तयार होतात. परंतु, यंदा वाहतूक बंद असल्याने साहित्याचा तुटवडा भासत आहे. शाडूच्या मूर्ती तयार करण्याची प्रक्रिया अधिक असल्याने अनेकांना मूर्तीच्या निर्मितीबाबत चिंता आहे.
– मनोज कुंभार, मूर्तीकार