मुंबई : देशात करोना बाधितांची संख्या आता 42 हजारांपेक्षा अधिक झाली आहे. मुंबईत काल दिवसभरात 21 जणांचा मृत्यू झाला तर 441 नवे बाधित रुग्ण आढळले. नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव इथे काल 27 नवीन कोरोना विषाणू बाधित आढळून आल्याने मालेगावमधल्या एकूण रुग्णांची संख्या 324 झाली आहे. तर नाशिक जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या 360 झाली असून, 12 जणांचा मृत्यू झाला आहे. जळगावमध्ये नवे 7 कोरोनाग्रस्त आढळून आले असून एकूण रुग्णसंख्या 52 झाली आहे. त्यापैकी 13 जणांचा मृत्यू झालेला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या एका पोलिस कर्मचाऱ्याला करोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. सोलापुरात काम करत असताना त्याला ही लागण झाली होती. काही दिवसांपूर्वी तो घरी आला होता. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांची चाचणी करण्यात आली मात्र त्यांना करोना विषाणूचा संसर्ग झाला नसल्याचे स्पष्ट झालं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आणखी दोन करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. मुंबईतून चालत आलेला एक रुग्ण मंडणगड तालुक्यातल्या तिडे गावचा रहिवासी आहे. संगमेश्वर तालुक्यातली एक महिलाही करोनाग्रस्त आढळून आली आहे.
सध्या रत्नागिरी जिल्ह्यात चार रुग्णांवर उपचार सुरू असून जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या दहा इतकी झाली आहे. सांगली जिल्ह्यात आणखी एक करोना बाधित रुग्ण आढळला आहे. कर्नाळ गावातला हा 35 वर्षीय रुग्ण सातारला गेला असता मुंबईहून आलेल्या नातलगाला भेटला होता. सध्यस्थितीत सांगली जिल्ह्यात एकूण सात करोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, तर आत्तापर्यंत जिल्ह्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या 34 झाली आहे.
उत्तरप्रदेशमध्य एका ट्रक चालकाला 2 मे रोजी वाशीम इथल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले होते. या ट्रक चालकाचा काल मृत्यू झाला. त्याच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कुकसा फाटा इथल्या ज्या पेट्रोल पम्पावर या चालकाने पेट्रोल भरले होते, तो पेट्रोलपंप खबरदारीचा उपाय म्हणून सील करण्यात आला आहे. तसेच या ट्रकचालकाच्या सहकार्याला विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.